

ठळक मुद्दे
कांदा पिकाचे आयुष्य वाढवण्यासाठी आधुनिक कोल्ड स्टोअरेज संकल्पना
पारंपरिक कांदा चाळीमुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान
कोल्ड स्टोअरेज सौरऊर्जेवर चालते, ज्यामुळे वीज खर्चात बचत होते
Priority given to solar-powered multipurpose cold storage concept
लासलगाव (नाशिक) : महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन विभागाच्या निर्णयानुसार, राज्यातील कांदा पिकाचे आयुष्य वाढवण्यासाठी आधुनिक कोल्ड स्टोअरेज संकल्पना राबविण्यावर भर दिला जात आहे. पारंपरिक कांदा चाळीमुळे उष्णता, आर्द्रता आणि कीटकांच्या प्रादुर्भावामुळे दरवर्षी शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याचे लक्षात घेता, सौरऊर्जेवर चालणार्या मल्टिपर्पज कोल्ड स्टोअरेज संकल्पनेला प्राधान्य देण्यात येत आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकरी कांद्याबरोबरच इतर भाजीपाला व फळेही सुरक्षितपणे साठवू शकतील, असा विश्वास महाराष्ट्र राज्य कृषी आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केला.
या संदर्भात कांदा-लसूण संशोधन केंद्र, राजगुरुनगर येथे पटेल यांच्या उपस्थितीत नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीस लासलगाव बाजार समितीच्या माजी सभापती सुवर्णा जगताप, शेतकरी प्रतिनिधी दीपक पगार, कला बायोटेकचे पदाधिकारी, निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष (नवी दिल्ली) विकास सिंग, सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनचे कमांडर अजय जादू आणि पणन मंडळ पुणेचे सदस्य सुहास काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
शासनाच्या विविध योजना व अनुदानांचा लाभ घेऊन शेतकर्यांनी पारंपरिक साठवणूक पद्धतीऐवजी या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. ग्रामीण भागात अशा प्रगत सुविधा उपलब्ध झाल्यास शेती अधिक शाश्वत व नफ्याची ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
कोल्ड स्टोअरेजमध्ये तापमान आणि आर्द्रतेचे नियंत्रण ठेवले जाते, त्यामुळे उत्पादन अधिक दिवस टिकते. यामुळे शेतकरी बाजारभाव वाढेपर्यंत माल साठवू शकतात आणि चांगला दर मिळवू शकतात. विशेष म्हणजे हे कोल्ड स्टोअरेज सौरऊर्जेवर चालते, ज्यामुळे वीज खर्चात बचत होते आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होतो.