

लासलगाव : गेल्या तीन महिन्यांपासून बांगलादेश सरकारने बॉर्डर बंदी करत भारतीय कांदा आयात थांबविल्याने देशातून होणारी कांदा निर्यात ठप्प झाली आहे. याचा थेट फटका कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बसत असून, निर्यातीवरील अवलंबित्वामुळे कांद्याचे बाजारभाव कोसळत आहेत. यातूनच सध्या बाजार समितीत कांद्याला अवघा 1,200 ते 1,500 रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.
भारतातून होणाऱ्या एकूण कांदा निर्यातीपैकी जवळपास ४० टक्क्यांहून अधिक हिस्सा एकट्या बांगलादेशात निर्यात होतो. २०२४- २५ या आर्थिक वर्षात ४.८० लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात केवळ बांगलादेशात झाली होती, ज्यातून देशाला १,७२४ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले होते. भारतातून बांगलादेशमध्ये दोन नंबर गुणवत्ता असलेला कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात होत असतो. त्यामुळे देशातून 40 टक्के एवढा मोठ्या प्रमाणात कांदा एकट्या बांगलादेशमध्ये निर्यात केला जातो. मात्र, बांगलादेश सरकारकडून भारतीय कांद्याची कोंडी केल्याने देशात मोठ्या प्रमाणात कांदा उपलब्ध आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढल्याने कांद्याचे दरही 1,200 ते 1,500 रुपये प्रतिक्विंटलच्या घरात आले आहेत.
बांगलादेशकडून अघोषितपणे आयात थांबवण्यात आल्याने, महाराष्ट्रातील विशेषतः लासलगाव, नाशिक, पुणे, सोलापूर आणि आहिल्यानगर भागातील कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. यंदा रब्बी हंगामात देशभरात कांद्याचे बंपर उत्पादन झालेले असताना निर्यात बाजार बंद झाल्याने स्थानिक बाजारात पुरवठा वाढत असून, भावही परवडण्यासारखे नसल्याचे शेतकरी बोलत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने बांगलादेशमधील निर्यात सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यापारी आणि शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
दर कमी होऊ नये, यासाठी केंद्राकडून प्रयत्न आवश्यक आहेत. नाफेड खरेदीलाही सध्या फारसा वेग नाही. खरेदी होत आहे, पण तो पुरेशी नाही. त्यात बांगलादेशाच्या आयात बंदीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
निवृत्ती न्याहारकर, शेतकरी
बांगलादेशला दररोज शेकडो ट्रक कांद्याची निर्यात होत होती. सध्या ती पूर्णपणे बंद आहे. यामुळे शेतकरी, व्यापारी दोघेही संकटात आहेत. सरकारने निर्यात पूर्वरत राहण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
मनोज जैन, कांदा निर्यातदार, लासलगाव