

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
दरवर्षी ७ जूनला येणारा मान्सून अद्याप दाखल झाला नसल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईचे संकट कायम आहे. विभागातील तब्बल सहा लाखांहून अधिक नागरिकांना सध्या २९३ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचे शासकीय आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक १४३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, दोन लाख ५५ हजार ८०९ नागरिक टंचाईग्रस्त आहेत. त्या खालोखाल अहिल्यानगर जिल्ह्यात १२८ टँकर कार्यरत असून, दोन लाख ४४ हजार १९६ नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जळगाव जिल्ह्यात २० टँकरद्वारे एक लाख १२ हजार ७१३ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे, तर धुळे जिल्ह्यात दोन टँकर सुरू असून, ७२ हजार ७६१ नागरिक प्रभावित आहेत.
विभागातील एकूण १३२ गावांसह एक हजार ११६ वाड्या वस्त्यांमध्ये पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गावांसाठी १३८ विहिरी राखीव ठेवण्यात आल्या असून, टँकरसाठी १०० विहिरींचा वापर करण्यात येत आहे. विशेष म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात सध्या एकही टँकर सुरू नसून, विहिरींच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.