

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यात यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश आणि पाठ्यपुस्तके देण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील ४ हजार २३८ शाळांमध्ये ४ लाख ६६ हजार ४६३ विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके मिळणार आहेत. याबाबत पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्रातून पुस्तके तालुक्यांना पाठविण्यात येत आहेत.
सर्वशिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात येणार आहेत. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी जिल्ह्यातील ४,२३८ शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी २८ लाख ३९ हजार ५१८ पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पुस्तके वितरित करण्याचे आदेश आहेत.
त्यानुसार ई-बालभारती पोर्टलवर ४ लाख ६६ हजार ४६३ लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची मागणी नोंदविण्यात आली आहे. लेखानगर येथील पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्रातून प्राथमिक शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांच्या हस्ते वितरणास प्रारंभ झाला. यावेळी सहायक कार्यक्रम अधिकारी सुनील दराडे, प्रमोद पगारे उपस्थित होते.
२० लाख पुस्तकांचे वितरण बाकी
जिल्ह्यातील १५ तालुक्यांतून चार हजार २३८ लाभार्थी शाळा असून, ४ लाख लाख ६६ हजार ४६३ विद्यार्थ्यांची संख्या आहे. त्यांच्यासाठी २६ लाख ३८ हजार ८७८ प्रतींची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत सहा लाख ४२ हजार सहा पुस्तके वितरीत करण्यात आली आहेत. १९ लाख ९६ हजार ८७२ पुस्तकांचे वितरण अद्याप बाकी आहे. तालुकापातळीवरून शाळांना पुस्तके पोहोच केली जाणार आहे. पुस्तके वाटपाची जबाबदारी ही शाळा मुख्याध्यापकांवर निश्चित केलेली आहे.
राज्य शासनाने विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पुस्तकांचे वितरण केले जात असून, पहिल्या दिवशी सर्वं विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याचे नियोजन आहे.
- साईलता सामलेटी, शिक्षणाधिकारी, प्राथमिक जि. प.