

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मान्सूनपूर्व स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी अतिशय समाधानकारक प्रगती नोंदविली. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या या मोहिमेत एप्रिल २०२६ अखेरच्या तालुकानिहाय अहवालानुसार जिल्ह्यातील १ हजार ३४२ ग्रामपंचायतींनी हिरवे कार्ड (ग्रीन कार्ड) मिळवून स्वच्छतेचा अव्वल दर्जा असल्याचे सिद्ध केले.
केवळ एका गावाला लाल कार्ड प्राप्त झाले आहे. जि. प.च्या पाणी व स्वच्छता विभागातर्फे दरवर्षी मान्सूनपूर्व पाण्याचे स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण केले जाते. प्रामुख्याने पावसाळ्यात उद्भवणारे साथीचे आजार रोखणे, पाणीस्रोतांचे शुद्धीकरण आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे या उद्देशाने ही मोहीम जिल्हा प्रशासनातर्फे राबविली जाते.
त्यानुसार विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील यांनी दि. १८ मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांना पत्र काढत, सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. त्यानुसार दि. १ ते ३० एप्रिल दरम्यान राबविण्यात आलेल्या मोहिमेचा अहवाल प्राप्त झाला आहे.
जिल्ह्यातील एकूण १ हजार ३८९ ग्रामपंचायतींपैकी १ हजार ३४२ ग्रामपंचायतींनी स्वच्छतेचे कडक निकष पूर्ण करीत हिरवे कार्ड पटकाविले आहे. ४६ ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड आणि अवघ्या १ ग्रामपंचायतीला लाल कार्ड श्रेणीत नोंदविण्यात आले. या आकडेवारीवरून ग्रामीण भागात स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी विल्हेवाट आणि सार्वजनिक आरोग्याविषयीच्या उपाययोजनांची किती प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे,
हे स्पष्ट होते. निफाड, बागलाण, सिन्नर आणि दिंडोरी या तालुक्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ज्या ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड मिळाले आहे, त्यांना आपल्या कार्यपद्धतीत तातडीने सुधारणा करीत स्वच्छतेचे निकष पूर्ण करण्याच्या कडक सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. कळवण तालुक्यतील एका गावाला लाल कार्ड मिळाले आहे.
जिल्हा परिषद प्रशासन आणि पाणी व स्वच्छता विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना नियमित मार्गदर्शन केले जात आहे. पिवळे व लाल कार्ड प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतींनी गावातील विविध प्रकारच्या त्रुटी दूर करून लवकरात लवकर हिरव्या श्रेणीत (ग्रीन झोन) समाविष्ट व्हावे स्वच्छतेसाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्व ग्रामपंचायती हिरव्या श्रेणीत आणण्याचे ध्येय आहे.
- दीपक पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.