

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा कहर केला असून, मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील १५४ गावांमधील तब्बल ३० हजार ५३ शेतकऱ्यांच्या सुमारे २२ हजार २७हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत.
गारपीट आणि वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे हाताशी आलेली पिके मातीमोल झाली असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. यापूर्वीही मार्च महिन्यात १८ मार्च रोजी २७० हेक्टर तर २९ मार्च रोजी ४८२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते.
सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून, उभ्या पिकांसह काढणीस आलेल्या पिकांनाही मोठा फटका बसला आहे. मालेगाव, सटाणा, देवळा, नाशिक, निफाड, सिन्नर आणि चांदवड या तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे.
विशेषतः सटाणा तालुक्यात अवकाळी पावसाने सर्वाधिक कहर केला असून, मोठ्या क्षेत्रावरील पिके वाधित झाली आहेत. जिल्ह्यातील इतर काही तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने तेथील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
सततच्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील शेती मोठ्या संकटात सापडली असून, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने मदत व पंचनाम्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कांदा व डाळिंबाला सर्वाधिक फटका
अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका कांदा आणि डाळिंब या पिकांना बसला आहे. १८ हजार ११९ हेक्टरवरील कांदा पिके बाधित झाली असून, १,८५८ हेक्टरवरील डाळिंब फळबागांचे नुकसान झाले आहे.
गारपीट व पावसामुळे कांद्याची गुणवत्ता खालावण्याची शक्यता असून, साठवणुकीवरही परिणाम होणार आहे. डाळिंब फळबागांमध्ये फळगळ व रोगराई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.