

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अगोदरच महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात 'महागाईचा ओव्हर डोस' घेऊन येणारी ठरणार आहे. होय, बुधवारपासून (दि.१) घरगुती वस्तूंसह सर्वच प्रकारच्या वाहनांमध्ये ५ ते १० टक्क्यांची वाढ होणार आहे. त्यामुळे वाहन खरेदीचे स्वप्न बघणाऱ्यांच्या खिशाला झळ बसणार आहे.
दरम्यान, इराण-इस्त्रायल युद्धामुळे महागाई आणखी भडकल्याने, सर्वसामान्य यात होरपळून निघत आहेत. दरवर्षी १ एप्रिलपासून दैनंदिन वापरातील वस्तूंच्या किमतीत सहसा वाढ होत असते.
यंदा मात्र महागाईचा दर तुलनेत जास्त असल्याने, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे. जागतिक स्तरावर कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ आणि मालवाहतुकीच्या दरातील वाढीमुळे विविध कंपन्यांनी आपल्या उत्पादनांचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला असून, १ एप्रिलपासून ते लागू होणार आहेत.
विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाइल क्षेत्रातील वस्तूंच्या दरात मोठी वाढ होणार आहे. या दरवाढीमागे कच्च्या मालाची टंचाई आणि वाढलेला उत्पादन खर्च ही मुख्य कारणे आहेत.
उत्पादन प्रक्रियेत महत्त्वाचे असलेल्या प्लास्टिक, रेझिन आणि पॉलिमर यांसारख्या कच्च्या मालाच्या किमतीत अचानक मोठी वाढ झाली आहे. कच्चा माल महागल्यामुळे कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढला असून, हा वाढीव खर्चाचा भार आता थेट ग्राहकांच्या खिशावर टाकला जाणार आहे.
इंधनाचे दर वाढणार!
काही दिवसांपूर्वीच घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती. १ एप्रिलपासून एलपीजीसह सीएनजी, पीएनजीच्या दरात वाढ केली जाण्याचा अंदाज आहे. युद्धामुळे एलपीजीसह सीएनजी आणि पीएनजीच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे दरांचा आणखी भडका होण्याचा अंदाज आहे.