नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये दाखल होणाऱ्या कोट्यवधी भाविकांना कोणत्याही परिस्थितीत वैद्यकीय सेवा कमी पडू नयेत, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. भाविकांची आरोग्य तपासणी, उपचार व्यवस्था, आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि साथीचे आजार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा समावेश असलेली व्यापक 'एसओपी' (मानक कार्यपद्धती) तयार करण्यात येणार आहे. नाशिक महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून हे नियोजन केले जाणार असल्याची घोषणा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब-कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली.
'पुढारी' माध्यम समूहाच्या वतीने आयोजित 'नाशिक आयकॉन' आणि 'आरोग्य रत्न' पुरस्कार सोहळ्यात मंत्री आबिटकर बोलत होते. सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातून कोट्यवधी भाविक नाशिकमध्ये येणार आहेत.
एवढ्या मोठ्या गर्दीमुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे. भाविकांना तसेच नाशिकच्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा आरोग्याचा त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील, असे मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आरोग्य नियोजनासाठी लवकरच बैठक घेण्यात येणार असून, त्यामध्ये वैद्यकीय सेवा आणि आपत्कालीन व्यवस्थेचा सविस्तर आराखडा निश्चित केला जाईल. नाशिक महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून काम केले जाणार आहे. पंढरपूर तसेच देशातील विविध कुंभमेळ्यांमध्ये आलेल्या अनुभवांचाही या नियोजनासाठी उपयोग केला जाणार असल्याचे त्यांनी 'आरोग्य रत्न' पुरस्कारार्थीचे अभिनंदन करताना त्यांनी पुरस्कार हा केवळ सन्मान नसून, चांगल्या कार्यासाठी प्रोत्साहन असल्याचे सांगितले. समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींच्या कार्यातून इतरांनीही प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही मंत्री आबिटकर यांनी केले.
'सार्वजनिक आरोग्य हा समाजकारणाचा विषय'
सार्वजनिक आरोग्य विभाग ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नसून, समाजसेवेची मोठी संधी आहे. लोकांच्या घराघरांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवून त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणे हेच या विभागाचे उद्दिष्ट असल्याचे मंत्री आबिटकर म्हणाले.
गर्दी व्यवस्थापनासोबत आजारांवरही लक्ष
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याने केवळ वैद्यकीय उपचार व्यवस्था उभारणे पुरेसे नाही, तर साथीचे आजार उद्भवू नयेत यासाठी आधीपासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने आरोग्य विभागाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. भाविकांना उपचारासाठी तत्काळ वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली जाणार असल्याचे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.