

नाशिकरोड : येथील १९८० - ८२ पासून व्यवसाय करणाऱ्या ३१ गाळेधारकांचे भवितव्य आता न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. महानगरपालिकेने अतिक्रमण निर्मूलन कारवाईचा बडगा उगारत दि. २५ जूनपर्यंत सर्व गाळे रिकामे करण्याच्या तोंडी सूचना दिल्या होत्या. मात्र, गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतल्यामुळे मनपाच्या कारवाईला तूर्त स्थगिती मिळाली आहे. आता १ जुलै रोजी नाशिकरोड न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनुराधा थिएटरसमोरील या गाळेधारकांना मनपा प्रशासनाकडून जागा रिकामी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या ठिकाणी सुमारे चार दशकांपासून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. मनपाने यापूर्वी १९९२ मध्ये जागा रिकामी करण्याचे निर्देश दिले होते. त्यावेळी आरक्षित जागेचा काही भाग गाळेधारकांनी प्रशासनाच्या सूचनेनुसार रिकामा करून दिला होता. मात्र उर्वरित जागेवर असलेल्या दुकानांवर आता पुन्हा कारवाई केली जात असल्यामुळे गाळेधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी गाळेधारकांनी सुमारे २० वर्षांपूर्वीच न्यायालयात दाद मागितली होती.
सध्या मनपाच्या निर्णयाविरोधात त्यांनी पुन्हा तक्रार दाखल कलेली असल्यामुळे कारवाईला तूर्त स्थगिती मिळाली आहे. दरम्यान, महानगरपालिका प्रशासनाकडून अनधिकृत बांधकाम काढून घेण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. सोमनाथ मुठाळ यांनी आभार मानले.