

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
परिसरातील राजमाता जिजाऊ तरण तलाव गेल्या पाच दिवसांपासून पाण्याअभावी बंद असल्यामुळे ऐन उन्हाळ्यात जलतरणपटूंचा हिरमोड झाला आहे. नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळविण्यासाठी तलावावर पोहण्यापासून वंचित राहावे लागत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात मोठ्या संख्येने नागरिक आणि जलतरणपटू या तलावाचा वापर करतात. येथे अनेक खेळाडूंनी नियमित सराव करून राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळविले आहे.
मात्र तलाव बंद राहिल्यामुळे त्यांचा सराव खंडित झाला असून, स्पर्धाच्या तयारीवरही प्ररिणाम झाला आहे. विशेष म्हणजे, या तलावाचे शेकडो सभासद असून, त्यांनी आगाऊ शुल्क भरलेले असतानाही सुविधा बंद असल्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ड्रायव्हिंग पूल अजूनही सुरू झालेला नाही.
गेल्या चार वर्षांपासून या पुलासाठी पाण्याची प्रतीक्षा कायम आहे. तलाव व्यवस्थापनानुसार, पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत तलाव बंद ठेवावा लागणार आहे. मात्र, परिस्थिती सुधारताच तातडीने तलाव सुरू करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. आहे. या तलावाला पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी जलतरणपटूंनी नगरसेवकांना निवेदन दिले आहे.
पाण्याची प्रचंड गरज
तरण तलाव सुरू ठेवण्यासाठी विशेषतः फक्त डायव्हिंग पुलासाठी सुमारे ३५ लाख लिटर पाणी लागते, तर सर्व पाच पूल सुरू ठेवण्यासाठी ७० ते ८० लाख लिटर पाणीसाठा आवश्यक असतो. याशिवाय, वॉटर सर्क्युलेशनसाठी दररोज ३ ते ४ लाख लिटर पाणी लागते.
महापालिकेच्या जलवाहिनी दुरुस्ती कामामुळे आम्हाला पाणी मिळतच नाही. यंदाच्या उन्हाळ्यात पोहण्याची संधी हुकण्याची शक्यता आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था करून हा पूल सुरू होण्यासाठी पाणीपुरवठा करावा.
-बशीर शेख, सामाजिक कार्यकर्ते, नाशिकरोड
सध्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा घटल्याने तलावाचाही पाणीपुरवठा थांबवण्यात आला आहे. परिस्थिती पूर्ववत होताच तलाव तातडीने सुरू करण्यात येईल.
- माया जगताप, व्यवस्थापक, जलतरण तलाव