

नाशिक : सलग दोन दिवस झालेल्या जोरधार पावसामुळे गोदावरीसह जिल्ह्यातील जवळपास सर्वच नद्या दुथडी भरून वाहिल्या. गंगापूर धरण आणि पाणलोट क्षेत्रातून झालेल्या विक्रमी विसर्गामुळे गोदावरी हंगामात प्रथमच पात्राबाहेर वाहिला. दरम्यान, गंगापूर धरणातून विसर्ग कायम असला, तरी पाणलोट क्षेत्रातील विसर्ग थांबल्यामुळे गोदावरीच्या पूर पात्रातीत आता घट होत आहे. त्यामुळे गोदाकाठ परिसरातील जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी नागरिकांकडून धडपड केली जात आहे.
गुरुवारी (दि. २३) झालेल्या दमदार पावसामुळे गोदावरीला मोठा पूर आला होता. गोदावरीच्या पुराचे पारंपरिक मानिक समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या डोक्यावरून होते. शुक्रवारी (दि. २४) देखील घाटमाथा क्षेत्रात पावसाच्या सरी बरसल्यामुळे पूरस्थिती कायम होती. शनिवारी (दि. २५) मात्र पुराच्या पाण्यात घट झाली. सायंकाळी ५ पर्यंत दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पुराचे पाणी आले होते. पावसाने क्षेत्रातून गोदापात्रात होणारा विसर्ग थांबल्यामुळे सातत्याने पात्रात घट होत आहे. दुपारी ३ पर्यंत गंगापूर धरणातून ८ हजार ३७० क्युसेकने विसर्ग सुरू होता, तर होलकर पुलाखालून १३ हजार ४६ क्युसेकने विसर्ग सुरू होता.
रामकुंडनावरील पारंपरिक दशक्रिया विधीच्या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे सुरू असल्याने, प्रशासनाने काही दिवसांपूर्वी यशवंतराव महाराज पटांगणावर पात्राच्या दोन्ही बाजूंसोबत दशक्रिया विधीसाठी तात्पुरते शेड उभारले होते. मात्र, पुराच्या पाण्यात दोन्ही बाजूंचे शेड वाहून गेले होते. पत्रे आणि लोखंडी खांब पाण्यात वाहून गेल्याने, दशक्रिया विधीसाठी प्रशासनाला पुन्हा व्यवस्था करावी लागणार आहे.
मागील काही दिवसांपासून हवामान विभागाकडून नाशिक आणि नाशिक घाटमाथा परिसराला रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट दिला जात होता. आता हवामान विभागाने नाशिकला थेट २९ जुलै रोजी यलो अलर्ट दिला आहे.