

Nashik Rain Alert: नाशिक जिल्ह्यात पुढील काही तासांत अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक शहराच्या पश्चिम भागात अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
नाशिकचे जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. त्यांनी सांगितले की, हवामान विभागाकडून मिळणाऱ्या माहितीनुसार प्रशासन सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. राज्य सरकारच्या सूचनांनुसार आपत्कालीन यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्र्यंबकेश्वर मंदिर पुढील दोन दिवस दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नियोजित पूजा विधी पार पडल्यानंतर मंदिरात भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. मंदिर परिसरात सुरू असलेली विकासकामे आणि मुसळधार पावसाचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
याशिवाय सप्तशृंगी गडावरील दर्शन व्यवस्थाही तात्पुरती बंद ठेवण्यात आली असून भाविकांनी या कालावधीत प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे नाशिक ग्रामीण, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच या भागातील आठवडी बाजारही बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
प्रशासनाने शेतकऱ्यांना शेतात न जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच नागरिकांनीही विनाकारण घराबाहेर पडू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्या ठिकाणी दरड कोसळण्याचा किंवा पूर येण्याचा धोका आहे, अशा रस्त्यांची पाहणी सुरू असून गरज भासल्यास ते तात्पुरते वाहतुकीसाठी बंद केले जाणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या समन्वयातून पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
जिल्हा प्रशासनाने पूराचा धोका असलेल्या गावांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले असून आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने मदत पोहोचवण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच हवामानातील बदल लक्षात घेऊन पुढील 24 तास अत्यंत सतर्क राहण्याची गरज असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.