

ठळक मुद्दे
मुंबईपाठोपाठ नाशिकमध्येही महाविकास आघाडी दुभंगण्याची शक्यता
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी अद्याप कुठलीही आघाडी नाही
निवडणुकांची प्रशासकीय तयारी सुरू: सर्वच राजकीय पक्षांची व्यूहरचना आखण्यास सुरुवात
Winds of discord began to blow in the Mahavikas Aghadi
नाशिक : इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकीसाठी, तर महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकांसाठी होती. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी अद्याप कुठलीही आघाडी नाही, असे स्पष्ट करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेना (उबाठा) व मनसे युतीवर उबाठा नेते खा. संजय राऊत यांनी शिक्कामोर्तब केल्यामुळे महाविकास आघाडीत फुटीचे वारे वाहू लागले आहेत. मुंबईपाठोपाठ नाशिकमध्येही महाविकास आघाडी दुभंगण्याची शक्यता निर्माण झाली असून, मनसेबरोबरची युती यासाठी कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर महापालिका, जिल्हा परिषद- पंचायत समित्यांच्या निवडणुकांची प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनीही या निवडणुकांसाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. नाशिक महापालिका निवडणुकीसाठी भाजपने १०० प्लसचा नारा देत विरोधी पक्षच नव्हे, तर राज्याच्या सत्तेतील घटक पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचा धडाका लावला आहे.
त्यामुळे शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून महायुतीची भाषा सुरू असली, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत भाजपची वाटचाल 'स्वबळा'च्या दिशेने असल्याचे दिसत आहे. त्यातच आता मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या शिवसेना (उबाठा) आणि मनसेने युतीची तयारी केल्यामुळे महाविकास आघाडीतही चलबिचल निर्माण झाली आहे. नाशिकमध्ये उबाठा आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि. ८) संयुक्त बैठक घेत भाजपविरोधात संयुक्त मोर्चा, आंदोलने करण्याचा इरादा जाहीर केला. या बैठकीस महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी (शरद पवार गट) व काँग्रेस या मित्र पक्षांना मात्र उबाठाने निमंत्रण दिले नव्हते. त्यामुळे नाशिकमध्ये उबाठा महाविकास आघाडीतून बाहेर पडत मनसेशी युती करून निवडणूक लढवेल, अशी चर्चा सुरू झाली असताना उबाठा नेते खा. राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उबाठा व मनसेची युती होणार असल्याचे संकेत दिल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी दुभंगणार हे आता स्पष्ट होऊ लागले आहे.
महापालिकेच्या मागील निवडणुकीतही शिवसेने (उबाठा)शी आघाडी नव्हती. काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी होती. पुढील निवडणुकीतही काँग्रेससोबत आम्ही राहू, उबाठासोबत आली, तर ठिक. नाही तर आम्ही आमचे निर्णय घेण्यास समर्थ आहोत. वेळ पडली, तर स्वबळावर निवडणुका लढविण्याचीही आमची तयारी आहे.
गजानन शेलार, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी (शरद पवार)
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडी, युतीचा निर्णय पक्षश्रेष्ठींकडून जाहीर केला जाईल. यापूर्वीच्या महापालिका निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादीसोबत होतो. ती नैसर्गिक आघाडी पुढील निवडणुकीतही कायम राहील, अशी अपेक्षा आहे. महाविकास आघाडीबरोबर राहायचे की, स्वतंत्र निवडणुका लढवायच्या हा निर्णय उबाठा आणि मनसेला घ्यावा लागणार आहे.
ॲड. आकाश छाजेड, शहराध्यक्ष, काँग्रेस.