नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी पहिल्याच महासभेत केलेल्या घोषणेनुसार थकबाकीदारांसाठी घरपट्टीच्या मनपाच्या करवसुली विभागाने राबविलेल्या अभय योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात तब्बल ३५ कोटी ७० लाखांची थकबाकी वसूल झाली आहे. गेल्या ११ दिवसांत तब्बल ९,७०० थकबाकीदारांनी या योजनेचा लाभघेतला असून १३.६४ कोटींची दंडमाफी मिळविली आहे.
दरम्यान, गत आर्थिक वर्षात घरपट्टीतून मिळविलेला २५७ कोटींच्या महसूल आकडा यंदा आर्थिक वर्ष संपण्यास २६ दिवस शिल्लक असतानाच कर विभागाने ओलांडला असून ५ मार्च अखेर घरपट्टीतून मनपाला २६२ कोटींचा महसूल मिळाला आहे. या योजनेत ९ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
जीएसटी अनुदानातून मिळणाऱ्या महसुलाखालोखाल घरपट्टी, पाणीपट्टीतून मिळणारा महसूल महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. मनुष्यबळाअभावी घरपट्टी देयकांचे वाटप होऊ न शकल्याने घरपट्टीच्या थकबाकीचा आकडा वाढत जाऊन सव्वासातशे कोटींवर पोहोचला आहे. या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने ऑगस्ट ते डिसेंबर २०२५ या दरम्यान अभय योजना लागू केली होती.
घरपट्टी मुदतीत न भरल्यास दरमहा दोन टक्के दंडाची तरतूद आहे. या योजनेअंतर्गत थकबाकीदारांना दंडाच्या रकमेत ९० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली होती. या योजनेच्या मुदतीतही थकबाकी न भरणाऱ्यांविरोधात महापालिकेने जप्तीची कारवाई सुरू केली होती. १२०० हून अधिक वड्या थकबाकीदारांना जप्ती वॉरंट बजाविण्यात आले होते.
दरम्यान, २० फेब्रुवारीला पहिल्या महासभेत महापौरांनी घरपट्टीच्या थकबाकीदारांसाठी पुन्हा अभय योजना लागू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार दि. २३ फेब्रुवारी ते ५ मार्चदरम्यान योजना राबविण्यात आली.
९,७०० थकबाकीदार मिळकतधारकांनी या योजनेचा लाभ घेत २८ कोटी मागील थकबाकी, तर ७.६८ कोटी चालू कर अशा प्रकारे ३५ कोटी ७० लाखांची घरपट्टी मनपाकडे जमा केली आहे. या माध्यमातून या थकबाकीदारांनी मनपाकडून १३.६४ कोटींची दंडमाफी मिळविली आहे.
घरपट्टीतून आतापर्यंत २६५ कोटी
२०२४-२५ या आर्थिक वर्षात मनपाला घरपट्टीतून २५७ कोटी ९५ लाखांचा महसूल मिळाला होता. यंदा आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच मनपाने १ एप्रिल २०२५ ते ५ मार्च २०२६ या दरम्यान २६२ कोटींचा महसूल मिळविला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा घरपट्टीच्या महसुलात ४ कोटींची वाढ झाली आहे. उर्वरित २६ दिवसांत आणखी महसूल वाढीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.