

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ तसेच घाटमार्ग वाहतूक व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या लेखानगर ते कलानगर चौक, अशोक आयलँड, खोडे मळा, वडाळा हॉस्पिटल, रविशंकर मार्ग ते विजय-ममता चौक या ४,२९० मीटर लांबीच्या रस्ते प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी करून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला.
मुंबई-आग्रा महामार्गाकडून तपोवनकडे जाणारा हा प्रमुख अंतर्गत रिंग रोड असून, वडाळा-पाथर्डी रोड, पुणे रोड तसेच सातपूर परिसराकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी हा महत्त्वाचा दुवा मानला जात आहे.
शहरातील वाहतूक वळविणे, पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे आणि आगामी सिंहस्थकाळातील वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करणे या दृष्टीने या रस्त्याला विशेष महत्त्व आले आहे. पाहणीदरम्यान आयुक्तांनी नादुरुस्त रस्ते पॅचेस, विविध क्रॉसिंग्ज, घाटांकडे जाणाऱ्या अॅप्रोच रोडची स्थिती तसेच वडाळा रोड परिसरातील ३३ केव्ही उपकेंद्राजवळील रस्ते पुनर्स्थापना कामांची तपासणी केली.
कामांची गुणवत्ता अबाधित ठेवत वाहतूक सुरक्षितता आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यावर भर देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आल्या. देण्यात विशेषतः पॅचेसची नादुरुस्त दुरुस्ती पुढील चार दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच काम सुरू असलेल्या भागात सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्याची एक बाजू बॅरिकेडिंग करून त्या मार्गावर एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्याचे आदेशही देण्यात आले.
सिंहस्थ आणि घाटमार्ग वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. कामांची गुणवत्ता अबाधित ठेवत नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, याची दक्षता घेऊन सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत. वाहतूक सुरक्षितता, तातडीने रस्ते पुनर्स्थापना आणि प्रभावी ट्रॅफिक व्यवस्थापनावर विशेष भर द्यावा, असे निर्देश मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी दिले.