नगरसुल : येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी चांगल्या पटसंख्येने शाळेत हजेरी लावत आहेत. मात्र दोन महिने उलटून स्वातंत्र्यदिन जवळ येत असताना गणवेशाविना विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित रहावे लागत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना गणवेशाविना रंगीत ड्रेसमध्ये राष्ट्रगीत गायनाची तयारी करावी लागत आहे.
ग्रामीण भागातील गरजू मध्यमवर्गीय गरीब लोकांना मुलांचे भवितव्य घडवण्यासाठी आजही जिल्हा परिषद शाळांना पसंती देत असतात. येथील शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी शाळेत सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू केले त्यामुळे पटसंख्येत वाढ झाली आहे. मिशन ॲडमीशन अंतर्गत जिल्हा परिषद शाळेत नवगतांचे छान स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना शाळा व शाळेच्या गणवेशाबद्दल वाटणारी उत्सुकता असली तरी दोन महिन्यानंतर गणवेश मिळणे अपेक्षित होते. मात्र स्वातंत्र्यदिन जवळ येऊन ठेपला असताना विद्यार्थ्यांना अजूनही मोफत गणवेशाची आतुरतेने वाट पहावी लागत आहे.
शाळा सुरू होऊन आज तिसरा महिना उलटला तरी पण सरकारने आम्हा गरिबाच्या मुलांना दिले जाणारे मोफत गणवेश अजूनही दिले नाहीत. आठ दिवसावर स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट आला असून मुलांना अजून शाळेचे कपडे नाहीत. मग आमची मुलं शाळेत कशी येणार? शासनाने आम्हा गरिबांच्या लेकरांना लवकरात लवकर गणवेश उपलब्ध करून द्यावा.
शकुंतलाबाई बाळू आरणे नगरसुल. पालक
शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना राज्य शासन मोफत गणवेश देणार आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत गणवेश मिळणार याबद्दल विद्यार्थ्यांना उत्सुकता असते. गणवेशामुळे शाळेमध्ये शिस्त राहते. जिल्हा परिषद शाळेत जास्त करून मध्यमवर्गीय मुले असतात, त्यांना गणवेशाची खूप गरज असते. शाळा उघडून अद्यापही गणवेश न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांप्रमाणे पालकांमध्ये नाराजी आहे. आता तरी शासनाने 15 ऑगस्ट पूर्वी गणवेश द्यावेत.
भिवसेन कोपनर, जि. प .शाळा, चिखलेवाडी.
येवला पंचायत समिती विस्ताराधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, शासन स्तरावर अद्यापही गणवेशाचे कापड उपलब्ध झाले नसून जेव्हा कापड उपलब्ध होईल तेव्हा बचत गटाच्या महिलांकडून गणवेश शिवून मुलांना दिले जातील.
संजय कुसाळकर, येवला पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी.
मागील वर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना गणवेश प्राप्त झाले होते. शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे शाळा उघडून दोन महिने झाले तरी विद्यार्थ्यांना गणवेश प्राप्त नाही. त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे. शासनाने निर्णय बदलून पूर्वीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली गणवेश खरेदी करावे.
गणेश कापसे, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, नगरसुल.