पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासी पाडे आज ही वीज, रस्ते, पाणी, आरोग्य व शिक्षण यापासून कोसो दूर असल्याचे अनेक घटनांमधून निदर्शनास आले आहे. पावसाळ्यात आदिवासी पाड्यांवर रस्ते, पाणी यासाठी नेहमीच संघर्ष करावा लागत आहे.
पावसाळ्याच्या दिवसात रस्ते नसल्याने चिखलाची वाट तुडवत, नदी, नाल्यांच्या पुरातून जीव धोक्यात घालत नागरिकांना बाजरपेठ तर विदयार्थ्यांना शाळा गाठावी लागते. काही दिवसांपूर्वी कासा डोंगरीपाडा येथील विद्यार्थ्यांना, नागरिकांना चिखलातून प्रवास करण्याची घटना समोर आली असताना पुन्हा एकदा कासा नजीक असणार्या तलवाडा कातकरी पाडा येथील विद्यार्थ्यांना तसेच गावातील नागरिकांना ये जा करण्यासाठी एका नाल्यावरील जीवघेण्या लाकडी साकवाचा आधार घेऊन शाळा तसेच तलवाडा बाजारपेठ व तालुका गाठावा लागतो आहे.
तलवाडा महालपाडा येथील आदिवासी कातकरी बांधवाना येण्याजाण्यासाठी रस्त्याची तसेच नाल्यावर पुल अथवा मोरी नाल्याने पावसाळ्यात चिखलाची वाट व तात्पुरत्या स्वरूपात लाकडी पूल तयार करून त्याचा वापर करावा लागत आहे. हा जिवघेणा प्रवास करावा त्यांना अनेक वर्षांपासून करावा लागतो. याबाबत लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रशासनाने येथील नागरिकांसाठी जाण्या येण्यासाठी सोय करून देण्याची मागणी येथील विद्यार्थी व नागरिक करत आहेत.