

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क - मराठायोद्धा मनोज जरांगे-पाटील यांची शांतता रॅली मंगळवार (दि.13) रोजी नाशिकमध्ये दाखल होत आहे. जरांगे हे वावी, सिन्नर, नाशिकरोडमार्गे शहरात दाखल होतील. त्यापुढे जेलरोड, नांदूरनाका, छत्रपती संभाजीनगर रोडमार्गे तपोवन येथे त्यांचे आगमन होईल. जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे शिर्डीवरून नाशिककडे प्रस्थान झाले असून सिन्नर व इतर ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात येत असल्यामुळे रॅली दीड ते दोन वाजेला सुरू होण्याची शक्यता सांगण्यात येत आहे. त्यांच्या स्वागतासाठी नाशिककर सज्ज झाले असून मालेगाव स्टँण्ड मित्र मंडळाच्या वतीने तब्बल अडीच हजार किलोंच्या वजनाचा झेंडूच्या फुलांनी सजवलेला सर्वांचे लक्ष वेधून घेणारा असा 16 फुटी हार तयार करण्यात आलेला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या रॅली मार्गात भाजप आमदार राहुल ढिकले यांच्या वाढदिवसानिमित्ताने ठिकठिकाणी शुभेच्छा होर्डिंग लावलेले असल्याने आणि त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील छायाचित्र झळकत असल्याने मराठा बांधवांकडून हे होर्डिंग फाडले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे रॅलीसाठी आगाऊ तैनात असलेल्या पोलीसांचा फौजफाटा वरुन लक्ष दिले जात असून पोलिसांची गुप्त माहितीवरुन असे कळते.
मनोज जरांगे नाशिकमध्ये दाखल होत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी मराठा बांधव जय्यत तयारीला लागले आहेत. त्यांच्याकरीता यावेळी तब्बल 400 किलोंचा भात देखील तयार करण्यात आलेला आहे.