नाशिक : महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीतर्फे मंगळवारी (दि. २७) पुकारलेला एकदिवसीय महाराष्ट्र व्यापारी बंद तात्पुरता स्थगित करण्यात आल्याची माहिती कृती समितीतर्फे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. (The one-day Maharashtra Traders Bandh called by the Maharashtra State Traders Action Committee has been temporarily suspended)
राज्यस्तरीय कृती समितीच्या बंदची व्याप्ती लक्षात घेऊन राज्य शासनातर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील सह्याद्री शासकीय अतिथिगृह येथे उच्चस्तरीय बैठक झाली. यामध्ये कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मा. आमदार माधुरी मिसाळ व नगरविकास विभागाचे मुख्य सचिव, पणन संचालक व विविध विभागातील अधिकारी वर्ग उपस्थित होते.
बैठकीदरम्यान, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व प्रश्न समजून घेतले. बाजार समिती तसेच जीएसटी व अन्य विषयांसाठी कृती समिती सदस्य व मुख्य सचिव व उच्च अधिकारी वर्गाची तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीला 30 दिवसांमध्ये योग्य निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले. बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ललित गांधी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून बंद मागे घेण्याचे आवाहन केले होते. बैठकीमध्ये महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र माणगावे, फॅमचे सचिव प्रीतेश शहा, ग्रोमाचे सचिव नीतेश वीरा, पुना मर्चंट चेंबरचे माजी अध्यक्ष प्रवीण चोरबोले, अनिल भन्साळी, ग्रोमाचे अध्यक्ष भीमजी भानुशाली उपस्थित होते.
एलबीटी कायदा 2015 साली रद्द होऊनही अद्याप याबाबत नोटीस येत असल्याचे ललित गांधी यांनी निदर्शनास आणून दिले. सर्व महापालिकांमधील एलबीटी विभाग बंद करण्याचे आदेश फडणवीस यांनी अधिकार्यांना दिले.