नाशिक: जिल्हा उद्योग मित्रच्या (झूम - Udyog mitra Sanstha, Nashik) मागील बैठकीतील मूळ अजेंड्यावर घेण्यात आलेले ४८ विषय व एनवेळी आलेले १२ विषय असे एकूण ६० विषय जैसे थे असताना यावेळच्या बैठकीसाठी मागविण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये निमा या उद्योजक संघटनेकडून १५ ते २० अतिरिक्त प्रश्नांची भर पडली. त्यामुळे आठ महिन्यानंतर मंगळवारी (दि. २७) होणाऱ्या या "झूम" बैठकीत समस्यांचा अक्षरशः पाऊस पडणार असून किती प्रश्न मार्गी लागतात याकडे उद्योजकांचे लक्ष लागून आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेल्या जिल्हा उद्योग मित्रच्या (झूम) (UDYOG MITRA STARTUP INSTITUTE) बैठकीला अखेत मुहूर्त सापडला असून मंगळवारी (दि. २७) जिल्हाधिकार्यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यालयात मंगळवार (दि.27) रोजी सकाळी ११ वाजता बैठक होणार आहे. आठ महिन्यांपूर्वी डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या झूम बैठकीत ६० प्रश्न मांडण्यात आले होते. त्यावेळी महानगरपालिका, महावितरण कंपनी व एमआयडीसी अधिकाऱ्यांनी स्वतंत्र बैठक घेत त्या त्या स्तरावरील प्रश्न मिटवण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र यापैकी एमआयडीसीच्या ३ तर महावितरणची केवळ १ बैठक पार पडली आहे. महापालिकेला कमीत कमी सात ते आठ स्मरणपत्रे देऊन देखील एकही बैठक घेण्यात आलेली नाही.
दरम्यान, बैठकीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडेच मनपा आयुक्त पदाचा अतिरिक्त कारभार आहे. त्यामुळे उद्योजकांचे महापालिकेसंबंधित प्रश्न मार्गी लागतील, अशी आशा उद्योग वर्तुळातून व्यक्त होत आहे.
निर्णयक्षम अधिकाऱ्यांव्यतिरिक्त प्रश्न मार्गी लागत नसल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे बैठकीला सर्व खात्यांचे निर्णयक्षम अधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य करावी, अशी आग्रपूर्वक विनंती जिल्हाधिकारी शर्मा यांना केली आहे.
धनंजय बेळे, अध्यक्ष, निमा, नाशिक.