नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क - शहरात शनिवार (दि.3) रोजीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातील गोदावरी नदीला पहिलाच पूर आल्याने नागरिकांनी पूर पाहण्यासाठी गर्दी केली. गोदावरी नदीवरील रामकुंडावरील छोटी मोठी मंदिरे पाण्याखाली गेली तर पाणी पातळी वाढीचे निर्देशक असलेले दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत पुराचे पाणी आले. तर दोन दिवसाच्या मुसळधारनंतर पावसाने विश्रांती घेतली असून सोमवार (दि.5) पासून गोदावरीचा पूर ओसरला आहे.
रविवारी (दि.4) रोजी मध्यरात्रीपासून पावसाने विश्रांती घेतल्याने आठ धरणांतील विसर्ग कमी करण्यात आलेला आहे. गंगापूर धरण हे 80 टक्क्यांपर्यंत भरले असून धरणातील आठ हजार क्युसेकवर पोहोचलेला विसर्ग सोमवारी (दि.5) रोजी सकाळी दोन हजार क्युसेकपर्यंत कमी करण्यात आलेला आहे.
श्रावण सोमवार (दि.5) रोजीपासून पावसाने विश्रांती घेतल्याने आठ धरणांतील विसर्ग कमी करण्यात आलेला आहे. त्यामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरीची पातळी कमी झाली आहे. गोदावरीच्या पाणी पातळीतील वाढीचे निदर्शक मानल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत रविवार (दि.4) रोजी सायंकाळपर्यंत पाणी आले होते. दिवसभर पावसाचा जोर कायम राहील्यानंतर सोमवार (दि.5) रोजी पूर ओसरल्याने गुडघ्यापर्यंत पाणी आले आहे. अनेक भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे रात्रीपासून गंगापूरसह बहुतांश धरणातील विसर्ग टप्प्याटप्याने कमी करण्यात आला आहे. सोमवारी (दि.5) सकाळी गंगापूरमधून दोन हजार क्युसेकचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरीच्या पातळीत मोठी घट झाली आहे. तर दुतोंड्या मारुतीचे दर्शन होऊ लागले आहे. रविवार होळकर पूलावरुन पाणी वाहू लागल्यानंतर सोमवारी पुलाखालील पातळीत सकाळी 10 वाजता नंतर सुमारे दीड हजार क्युसेकने घट झाली आहे.