

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात इंधन दरवाढ आणि संभाव्य टंचाईच्या चर्चेमुळे नागरिकांत पॅनिकचे वातावरण निर्माण झाले आहे. पेट्रोलपंपांवर वाहनांच्या रांगा लावू नये यासाठी जिल्ह्यात इंधनाची टंचाई नाही, असे स्पष्ट करत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी तेल कंपन्यांचे प्रतिनिधी व पुरवठा विभागाची तातडीची बैठक घेत आढावा घेतला. यावेळी ऑइल कंपनी प्रतिनिधी तसेच पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड उपस्थित - होते. बैठकीत तेल कंपन्या प्रतिनिधींकडून आढावा सादर करताना बीपीसीएलकडून सांगितले की, रिटेल वापरासाठी ३५० लिटरपर्यंत ऑटो लॉक व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. त्याचावर इंधन दिले जात नाही.
औद्योगिक क्षेत्रासाठी इंधन दरात प्रतिलिटर ४० रुपयांपर्यंत वाढ झाल्याची चर्चा बैठकीत झाली. नायरा कंपनीच्या डिझेल दरात सुमारे ६ रुपये तर पेट्रोलमध्ये ३ रुपयांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी प्रसाद यांनी कंपनी प्रतिनिधींना सूचना दिल्या की, कुंभमेळ्याशी संबंधित कंत्राटदारांची यादी कंपन्यांकडे दिली जाईल, कंत्राटदारांना तुमची यादी दिली जाईल. त्यांना ब्राउझर पद्धतीने डिझेल पुरवठा करावा, त्यासाठी पोलिस बंदोबस्त लागत असेल तर तो मी देतो.
एमआयडीसी क्षेत्र, रुग्णालये आणि अत्यावश्यक सेवांसाठी विशेष प्राधान्याने इंधनपुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले. यासाठी स्वतंत्र नियंत्रण यंत्रणा कार्यरत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील पेट्रोलपंपांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहे. ग्रामीण भागातील किमान ८० टक्के पुरवठा सुरू ठेवण्यावर भर देण्यात यावा, अशी सूचना दिली. काही कंत्राटदारांना घरपोच इंधन पुरवठ्याची सोय उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली.
सौरऊर्जेचा वापर करणाऱ्या काही यंत्रणांमुळे डिझेलवरील ताण कमी करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, नागरिकांनी घाबरून इंधन साठवू नये. पुरेसा साठा उपलब्ध असून, वितरण सुरळीत सुरू आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या संभाव्य दरवाढीच्या चर्चेमुळे वाहनधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, अनेकांनी आगाऊ इंधन भरण्यास सुरुवात केली आहे. मात्र, नागरिकांनी पॅनिक न होता पेट्रोल डिझेलसाठी गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे.
पंपांची संख्या वाढणार
जिल्ह्यात नवीन पेट्रोलपंप सुरू करण्यासाठी १६ प्रस्ताव प्रशासनाकडे आले आहेत. त्यासाठी पूर्तता झाली की पंपांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे वितरण व्यवस्थाही सुरळीत होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा करण्यात आली.