

देवळा : आईच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी मुलाचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना गुरूवारी (दि.२५) सरस्वती वाडी गावात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, देवळा तालुक्यातील सरस्वतीवाडी येथील सुशिलाबाई अभिमन विश्वास (वय ६८) यांचे बुधवारी (दि.२४) अल्पशा आजाराने निधन झाले.आईच्या निधनाची धास्ती घेऊन त्याच दिवशी मुलगा दत्तू अभिमन विश्वास (४२) यांचा ब्लड प्रेशर वाढला. त्यानंतर नातेवाईकांनी त्याला देवळा येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला नाशिकच्या मविप्रच्या आडगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना गुरूवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.
आईचा शुक्रवारी सकाळी रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम होता .त्याच दरम्यान मुलगा दत्तूने आपला प्राण सोडला. या ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने विश्वास कुटुंबियांवर दुखाचा डोगर कोसळला आहे. दत्तू यांच्या मृतदेहाजवळ पत्नी व लहान मुलांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे मन सुन्न झाले होते. आईवर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच ठिकाणी गुरूवारी दुपारी अत्यंत शोकाकुल वातावरण दत्तू यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे सरस्वतीवाडी गावात शोककळा पसरली आहे . दत्तू यांच्या पश्चात बहीण, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.