नाशिक : शहरात गत दोन महिन्यांत म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीत वृद्धेचा, तर इंदिरानगर पोलिस ठाणे हद्दीत महिलेचा खून झाला. या दोन्ही घटनांमधील संशयित मारेकऱ्यांची प्राथमिक ओळख पटली असली, तरी ते फरार असल्याने खुनाचे मुख्य कारणही अद्याप गुलदस्त्यातच आहे.
म्हसरूळ येथील गुलमोहर कॉलनीतील रहिवासी कुसुम सुरेश एकबोटे (८०) या वृद्धेचा खून ९ जुलैला त्यांच्याच घरात धारदार शस्त्राने वार करून झाल्याचे उघडकीस आले होते. या घटनेस दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटला, तरी मारेकरी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. संशयित हा एकबोटे यांच्याच इमारतीतील रहिवासी असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्याची ओळख पटलेली असली, तरी तो अद्याप हाती लागलेला नाही.
तर, इंदिरानगरच्या सदाशिवनगरमध्ये २९ ऑगस्ट रोजी निशा नागरे या महिलेचा मृतदेह घरात आढळला होता. तिच्यासमवेत राहणाऱ्या मयूर नागरे यानेच हा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. गुन्हा घडल्यापासून संशयित नागरे हाही फरार आहे. त्याचाही अद्याप शोध न लागल्याने निशाचा खून का करण्यात आला व तिचे नातलग तसेच तिचा भूतकाळही गुलदस्त्यात आहे.
दोन्ही गुन्ह्यांमधील संशयितांची ओळख पोलिसांना पटली आहे. त्यातील कुसुम एकबोटे यांचा मारेकरी हा हरसूल, पेठ, सुरगाणा भागात लपून बसल्याचे समजताच पोलिसांनी तेथे शोध घेतला. मात्र तो तेथे आढळला नाही. तसेच हा संशयित मोबाइल वापरत नसल्याचे समजते. त्यामुळेही पोलिसांना त्याचा शोध घेणे अवघड झाल्याचे बोलले जाते, तर संशयित नागरे याचादेखील थांगपत्ता गुन्हा घडल्यापासून लागलेला नाही.
दोन्ही महिलांच्या खुनाची कारणे अद्याप समोर आलेली नाहीत. त्यातील नागरेची खरी ओळख अद्याप पटलेली नसल्याने तिच्या नातलगांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे तिचा मृतदेह शवागारातच आहे. संशयित मयूरला पकडल्यानंतरच तिची ओळख व खुनाचे कारण समोर येणार आहे.