

Nashik affected farmers issue
नाशिक : ज्यांच्या जमिनी जात नाही, संबंध नाही त्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. १० ते ५ वेळ असताना सकाळी ७ वाजता का आले? इंग्रजही सांगून आले होते. तुमच्या चुकीच्या धोरणामुळे एखाद्या शेतकन्याने चुकीचे पाऊल उचलले, तर त्याला तुम्ही जबाबदार असणार, सोमवारी सकारात्मक उत्तरे दिली नाही, तर बेमुदत उपोषण करू, जे परिणाम होतील, त्यास जिल्हाधिकारी जबाबदार असतील, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मुंगसरा येथे भेट देत बाह्यरिंग रोडसाठी बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी व घरांची पाहणी केली. तेथे काही शेतकऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, यावर काही शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात येत आंदोलनात्मक भूमिका घेतली. मात्र, जिल्हाधिकारी दुसऱ्या कार्यक्रमात व्यग्र होते.
त्यांच्याशी शेतकरी प्रतिनिधी करण गायकर यांनी मोबाइलद्वारे संपर्क साधला. त्यांनी ३ ची वेळ सांगितली. ती शेतकऱ्यांना मान्य नाही. आताच येऊन चर्चा करावी, असा आग्रह धरला. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी ते मान्य केले नाही. करण गावकर यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांचा जमिनी बाधित होत नाहीत, अशा शेतकऱ्यांची भेट घेतली. बाधित शेतकरी दोन-चार होते. सर्व बाधित शेतकऱ्यांना बोलावून बैठक घेऊन चर्चा करणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी गावात १० ते ५ वेळेत येणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. केवळ गावात भेट देऊन पाहणी केली. ज्या पद्धतीने जिल्हाधिकारी प्रसाद सकाळी ७ला आले, याचा अर्थ २ मे रोजी प्रांत पवन दत्ता यांनाही सकाळी ७ ला जाण्याची सूचनाही जिल्हाधिकारी यांनीच दिली आहे. त्यामुळे त्या दिवशीही अनुचित प्रकार घडला, असा आरोप शेतकऱ्यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री दत्ता भरणे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी केली.
विल्होळी येथे बैठक
विल्होळीत रविवारी शेतकऱ्यांची बैठक आहे. त्यात चर्चा करून सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात योग्य वेळ हवी अशी मागणी केली. त्र्यंबक रोडवर उद्योगपती अदानी यांनी १०० एकर जमीन घेतली आहे, तिला जोडण्यासाठी बाह्यरिंग रोडचा पहिला प्लॅन बदलला. त्यासाठी शेतकऱ्यांवर अन्याय झाला तरी चालेल. मात्र, उद्योगपतीचा फायदा झाला पाहिजे, अशी भूमिका आहे, असा आरोप अक्षय कातड यांनी केला.
जिल्हाधिकाऱ्यांचा संदेश
शेतकऱ्यांना चर्चेसाठी वेळ द्या, अशी मागणी गायकर यांनी जिल्हाधिकारी यांना संदेश पाठवून केली. त्यावर जिल्हाधिकारी यांनी दुपारी ३ ची वेळ सांगितली. मात्र, शेतकरी आता वेळ द्यावी, यासाठी आग्रही होते. मात्र, जिल्हाधिकारी त्र्यंबकेश्वर येथे महिला व बालकल्याण समिती बैठकीत होते. त्यामुळे ११ ची वेळ ते देऊ शकत नव्हते. त्यावर सोमवारी ११ ची वेळ शेतकऱ्यांनी मागितली. मात्र जिल्हाधिका-यांनी सोमवारी न्यायालयीन कामासाठी बाहेर जावे लागेल म्हणून शक्य होणार नसल्याचा संदेश दिला. यावर शेतकऱ्यांनी आपल्याला टाळत असल्याचा आरोप करीत तीव्र संताप व्यक्त केला.
मुंगसरा येथे पाहणी
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गावात येऊन पाहणी करावी, अशी मागणी शेतकयांनी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी प्रसाद यांनी मुंगसरा येथे पाहणी केली. काही शेतकऱ्यांची भेट घेत चर्चा केली. त्यात काय मार्ग काढता येईल, तेवहा काढू अशी ग्वाही दिली. त्याबाबत एमएसआरडीसीला कळविल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.