

नाशिक : स्वच्छ व प्रदूषणमुक्त हवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिकने आपली ओळख अबाधित ठेवली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नुकत्याच जारी केलेल्या टॉपटेन शहराच्या यादीत नाशिक शुद्ध हवेच्या गुणवत्तेत पाचव्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. या टॉप टेनमध्ये महाराष्ट्रातील आणखी दोन शहरे असून दुसऱ्या क्रमांकावर अहिल्यानगर तर चाैथ्या क्रमांकावर मिरा भाईंदरने स्थान मिळवले आहे.
गेल्या ३ नोव्हेंबरला केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने हवेची सर्वोत्कृष्ट गुणवत्ता असलेल्या व हवेची गुणवत्ता ढासळलेल्या देशातील टाॅपटेन शहराची यादी जाहीर केली. त्यात मेघालयातील शिलाँगने १२ एअर क्वॉलिटी इंडेक्स नोंदवला. पाठोपाठ अहिल्यानगरने २५ एक्यूआय नोंदवत दुसरे स्थान मिळवले. तिसऱ्या स्थानावर २७ एक्यूआयसह तामिळनाडूतील मदुराई शहर असून चौथ्या स्थानी २९ एक्यूआयसह मिरा भाईंदरने स्थान मिळवले. पाचव्या स्थानी नाशिकने ३० एक्यूआयसह स्थान मिळवत नाशिकच्या हवेची गुणवत्ता आल्हाददायक असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. नाशिकची भाैगाेलिक रचना, हिरवळ तसेच सतत वाहणारे वारे या सर्व घटकांमुळे नाशिकच्या हवेचा दर्जा नैसर्गिकदृष्ट्या उत्तम आहे. त्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महापालिकेने केलेल्या संयुक्त प्रयत्नातून नाशिकला शुद्ध हवेचा दर्जा टिकवून ठेवता आला आहे.
टॉपटेन शहरांची यादी अशी...
शिलाँग (मेघालय) - १२
अहिल्यानगर (महाराष्ट्र) - २५
मदुराई (तामिळनाडू) - २७
मिरा भाईंदर (महाराष्ट्र) - २९
नाशिक (महाराष्ट्र) - ३०
योदगीर (कर्नाटक) - ३०
पाळकलईपेरूर (तामिळनाडू) - ३१
सिवासागर (आसाम) - ३१
कोप्पाल (कर्नाटक) - ३२
गदग (कर्नाटक) - ३४
उद्योगांना वेळोवेळी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनामुळे त्यांनी घेतलेली काळजी तसेच महापालिका प्रशासनासोबतच्या बैठकानंतर त्यांनी केलेल्या एनकॅप उपाययोजनांमुळेच नाशिकला शुद्ध हवेचा दर्जा टिकवून ठेवता आला. पुढील काळातही अशाच प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा आहे.
प्रशांत गायकवाड, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ