

पुढारी ऑनलाइन डेस्क | नाशिक-मुंबई महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबीयांप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. या अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाख आर्थिक सहाय्य देण्यात येईल आणि जखमींचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यासंदर्भात एक्सपोस्ट करुन त्यांनी माहिती दिली आहे.
रविवारी (दि.१२) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास नाशिकच्या द्वारका पुलावर भीषण अपघात झाला. निफाड तालुक्यातील धारणगाव येथून धार्मिक कार्यक्रम आटोपून सिडकोकडे परतताना द्वारका चौकाच्या अलीकडे उड्डाणपूलावर पुरूष भाविकांचा टेम्पो पाठीमागून लोखंडी सळ्यांच्या ट्रकवर (एम.एच२५ यू ०५०८) जाऊन धडकला. त्यामुळे ट्रकमधील लोखंडी सळ्या पिकअप ट्रकच्या काचा फोडून मागच्या भागात शिरल्या. या लोखंडी सळ्या थेट मागच्या भागात असलेल्या मुलांच्या अंगात शिरल्या. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले. तर 14 जखमी जखमी आहेत.
या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी जखमींच्या कुटुंबियांची भेट घेतली. अपघात स्थळाची पाहाणी देखील केली. संबधित दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात रस्ते वाहतुकीत शिस्त आणणं गरजेचं असल्याचे महाजन म्हणाले. यासंदर्भात पोलिस व आरटीओची तातडीची बैठक त्यांनी बोलावली.