

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील मन्याड चौकी (बामूळवाडी) परिसरात आई-वडिलांच्या शेजारी झोपलेली अवघी आठ महिन्यांची चिमुर्डीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. १७) मध्यरात्री घडली. तनू मच्छिंद्र मोरे असे बेपत्ता बालिकेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडील मच्छिंद्र सुरेश मोरे यांनी नांदगाव पोलिस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दिली आहे.
दाखल फिर्यादीनुसार, गुरुवारी रात्री मोरे कुटुंबीय जेवण केल्यानंतर घरात झोपले असताना, रात्री ११.३० ते मध्यरात्रीच्या सुमारास मोरे यांच्या पत्नीला जाग आली असता, त्यांच्या शेजारी झोपलेली आठ महिन्यांची तनू जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. बालिका बेपत्ता असल्याचे लक्षात येताच, कुटुंबीयांनी घरासह परिसरात शोध घेतला.
मन्याड चौकी, बामूळवाडी तसेच परिसरातील विविध ठिकाणी कुटुंबीय, नातेवाईकांनी रात्रभर शोध घेतला. मात्र, बालिकेचा ठावठिकाणा लागला नाही. शुक्रवारी (दि. १८) दिवसभरही परिसरात शोध घेण्यात आला; मात्र तिचा शोध लागला नाही. घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलिसांनी धाव घेत बालिकेचा शोध घेण्यासाठी श्वान पथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण केले.
मालेगावचे अपर पोलिस अधीक्षक सूरज गुंजाळ, मनमाडचे पोलिस उपविभागीय अधिकारी रोशन पंडित, पोलिस निरीक्षक यशवंत सोळंके, सहायक पोलिस निरीक्षक सतीश गावित यांच्यासह मालेगाव व नाशिक येथील स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली.
बालिका नेमक्या कोणत्या परिस्थितीत बेपत्ता झाली, याचा तपास विविध पातळ्यांवर केला जात आहे. दरम्यान, बालिकेला एखाद्या जंगली प्राण्याने उचलून नेले असावे किंवा अन्य काही घटना घडली असावी, अशा विविध शक्यता स्थानिकांकडून व्यक्त होत आहेत. मात्र, या शक्यतांना पोलिसांकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता, पोलिसांकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आठ महिन्यांच्या चिमुकलीच्या बेपत्ता होण्यामुळे मोरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.
नांदगाव तालुक्यातील मन्याड चौकी (बामूळवाडी) येथील घटना.
श्वान पथक व फॉरेन्सिक टीमद्वारे घटनास्थळी पुरावे गोळा करण्याचे काम सुरू.
नाशिक व मालेगाव गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी तपासासाठी घटनास्थळी दाखल.
घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी, शनिवारी (दि. १९) याच परिसरातील श्रावण दामू मोरे (५५) यांनी वन विभागाच्या हद्दीत जाऊन गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या आत्महत्येचा संबंध बेपत्ता बालिकेच्या प्रकरणाशी आहे का, याचाही तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्वान पथकाने माग काढत याच परिसरातील श्रावण दामू मोरे (५५) यांच्या घरापर्यंत माग काढल्यामुळे पोलिसांनी मोरे यांना चौकशीसाठी ताब्यात घेत दिवसभर चौकशी करून सोडून दिले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी मोरे यांनी वन विभागाच्या हद्दीत जाऊन गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे.