नाशिक : निखिल रोकडे
राज्यात सर्वत्र मुसळधारेने थैमान घातले असतानाही राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांची गैरसोय कमीत कमी होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली जाणे, दरडी कोसळणे आणि पूल व रस्त्यांवर पाणी साचल्याने काही बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. मात्र, पावसाचा जोर कमी होताच महामंडळाने सेवा वेगाने पूर्ववत करत अवघ्या एका दिवसात रद्द फेऱ्यांची संख्या ३,४३१ वरून केवळ ८९ पर्यंत आणली. त्यामुळे राज्यभरातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महामंडळाच्या आकडेवारीनुसार, ५ जुलै रोजी राज्यभरात ३९६ नियत फेऱ्या आणि ३,४३१ बसफेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे १ लाख ५० हजार ६५०.२ किलोमीटर अंतराची सेवा प्रभावित झाली. या परिस्थितीमुळे महामंडळाला ५८ लाख १० हजार १४८ रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले.
मात्र, ६ जुलै रोजी एसटीची सेवा पुन्हा सुरळीत झाली. राज्यभरात केवळ १५ नियत फेऱ्या आणि ८९ बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. रद्द किलोमीटरचे प्रमाण १०,३३०.१ इतके राहिले, तर महसुली तोटा ३ लाख ७ हजार १८४ रुपये इतकाच नोंदविण्यात आला. यावरून बहुतांश मार्गावरील एसटी सेवा पूर्ववत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई प्रदेशात ६ जुलै रोजी केवळ सिंधुदुर्ग विभागातील एक नियत आणि आठ बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. नागपूर, पुणे आणि अमरावती प्रदेशातील सेवा जवळपास पूर्णपणे सुरळीत राहिली. दरम्यान, हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने सर्व विभागीय नियंत्रण कक्षांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
प्रवाशांनी प्रवासापूर्वी संबंधित आगाराशी किंवा एसटीच्या अधिकृत माध्यमांवरून बससेवेची अद्ययावत माहिती घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन महामंडळाने केले आहे. नाशिक विभागात पावसाचा परिणाम कायम असल्याने नाशिक व अहिल्यानगर विभागात मिळून १४ नियत फेऱ्या आणि ८१ बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे ६,१२०.७ किलोमीटर सेवा प्रभावित झाली आणि २ लाख १५ हजार ३४६ रुपयांचे उत्पन्न बुडाले.