

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लांब पल्ल्याच्या प्रवासात एस. टी. चा अधिकृत थांब्यांवर प्रवाशांची चहा-नाश्त्यासाठी होणारी लूट आता थांबणार आहे. अवाच्या सव्वा दर आकारणीतून हॉटेल व्यावसायिक प्रवाशांना वेठीस धरू शकणार नाही. कारण परिवहन विभागानेच आता प्रवाशांसाठीचा नाश्त्याचे दर निश्चित करून दिले आहेत.
हा निर्णय प्रवाशांना दिलासा देणारा व एस. टी. वरील विश्वास दृढ करणारा ठरला आहे. प्रवास म्हटला म्हणजे वेळेनुसार चहा नाश्ता घ्यावाच लागतो. त्यातच लांब पल्ल्याच्या प्रवासात ते आवश्यक आहे. अनेक प्रवासी सध्या प्रवासाला निघताना घरूनच पूर्वनियोजनाने निघतात. त्यामुळे सोबत नाश्ता किंवा जेवणाची सुविधा करूनच निघतात.
मात्र, सकाळी लवकर किंवा सायंकाळच्या प्रवासात प्रत्येकालाच सोबत खाण्या-पिण्याचे नियोजन करून निघणे शक्य होत नाही. साधारण पाच ते सहा तासांचा म्हणजे किमान दोनशे ते तीनशे किलोमीटर अंतराचा प्रवास म्हटल्यावर प्रवासात कुठे तरी थांबून नाश्ता व चहा घेण्याचे प्रवासी विचार करतात. त्यासाठी एस. टी.ने त्यांचे ठराविक किलोमीटरवरील हॉटेल ालकांशी अलिखित करार केल्यासारखे आहे.
त्या हॉटेलच्या थांब्यावर बस थांबविली म्हणजे वाहक आणि चालकाला पाहिजे तो नाश्ता व चहा विनामूल्य दिला जातो. कारण ते बस थांबवतात म्हणून हॉटेल व्यवसाय होतो. मात्र, या थांब्यांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात लूट केली जाते.
नाश्ता, पाणी बॉटल असो की चहा कॉफीसाठी अवाच्या सव्वा दर आकारले जातात. विशेष म्हणजे त्या पदार्थ किंवा पेयाची गुणवत्ताही नसते. मात्र, प्रवाशांना नाईलाज असतो. त्यातच लहान मुले सोबत असलेल्या प्रवाशांची चांगली आर्थिक लूट वाढते. एरवी बाजारातील दरापेक्षा व एमआरपीपेक्षाही जास्त दर आकारले जात असल्याचे चित्र आहे.
प्रवाशांची ही लूट लक्षात घेऊन परिवहन मंडळाने आता प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. त्यात नाश्ता-चहाचे दर निश्चित करून दिले आहेत. एस. टी. बसचा अधिकृत ठरलेल्या थांब्यावर आता प्रवाशांना ४० रुपयांत पोहे, शिरा, पाववडा आदींपैकी कोणतेही एक पदार्थ व चहा असे निश्चित केले आहे. त्यामुळे प्रवाशांकडून अवाच्या सव्वा दर आकारून होणारी लूट थांबणार आहे. हा निर्णय नक्कीच प्रवासी व एस. टी. महामंडळ यांच्यातील संबंध अधिक दृढ करणारा ठरणार आहे.