

Minister Manikrao Kokate: felicitated by the entire Maratha community
नाशिक : पुढारी वृत्तसेवा आपले नेतृत्व राज्यात प्रस्थापित व्हावे यासाठी समाजाला वेठीस धरू नका. समाजा-समाजामध्ये भेदभाव करू नका, असंतोष निर्माण करू नका, अशी अपेक्षा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केली.
कालिका माता मंदिर सभागृहामध्ये आयोजित जिल्हा सकल मराठा समाज सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पोलिस उपायुक्त किशोर काळे, सकल मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर, केशव पाटील, विलास पांगारकर, नाना बच्छाव, व्यंकटेश मोरे आदी उपस्थित होते.
मंत्री कोकाटे म्हणाले की, मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने मोर्चे काढले. मात्र, दुर्दैवाने त्यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय राज्य सरकारला घेता आला नाही. उच्च न्यायालयात टिकेल असा निर्णय होत नसल्याने, मराठा समाज अस्थिर होता. आरक्षणाची धग आपल्याकडे फारशी जाणवत नसली, तरी मराठवाड्यात हा प्रश्न जास्त गंभीर असल्याने, मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आपण सर्व मराठा बांधव खंबीरपणे उभे होतो. त्यांच्या भूमिकेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मराठ्यांचे समर्थन होते. त्यांचे आंदोलन सनदशीर मागनि होते. त्यांच्या मागण्या न्याय्य होत्या. त्यामुळे जेव्हा उपसमितीत माझा सहभाग झाला, तेव्हाच मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मी निर्धार केला. गुन्हे मागे घेण्यासाठी व अन्य मागण्यांसाठी प्रशासन दरवेळी सहा ते आठ महिन्यांचा वेळ मागत होते. मात्र, आठ दिवसांत सर्व मागण्या मान्य झाल्या पाहिजे, अशा सूचना देऊन काम केल्याने, मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याचे मंत्री कोकाटे म्हणाले.
काही लोक सरकारच्या या निर्णयाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. एनटीमधून आरक्षण मागितले नसतानाही काही मंडळी मोर्चे काढत आहेत. वास्तविक, यांचा काहीही संबंध नाही. जरांगे पाटील यांनी नियमाने आरक्षण मागितले. कायद्याला धरून आंदोलन उभे केले. काही मंडळी अनावश्यकपणे राजकारण करीत आहेत. मराठा समाज नेतृत्व करणारा समाज आहे. कधीही अन्य समाजावर अन्याय करीत नाही. त्यामुळे इतरांनी राजकारण थांबवावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी आशिष हिरे, बंटी भागवत, विष्णूपंत म्हैसधुणे, राजू उगले, निखिल सुगंधी आदी उपस्थित होते.
मंत्री माणिकराव कोकाटे यांनी समाजकल्याणला भेट देऊन, मराठा समाजाला उद्भवणाऱ्या समस्या सोडवाव्यात.
जिल्ह्यातील मराठा संघटनांची नियमित बैठक घेऊन त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करावी.
सारथी शिक्षण संस्था, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी शिबिरे घ्यावीत.
जिल्ह्यात मराठा समाजाच्या वसतिगृह पूर्णत्वासाठी प्रयत्न करावेत.
जिल्ह्यात मराठा भवनाची उभारणी करावी.
जरांगे- पाटील यांच्या आंदोलनामुळे बैठकांवर बैठका घेतल्या. त्यात कॅबिनेटमध्ये आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचा विचार पुढे आल्याने, आम्ही जो निर्णय घेणार तो बंधनकारक असेल, हे स्पष्ट केले गेले. पुढे मागण्यांवर टप्प्याटप्प्याने निर्णय घेण्यात आला.
ब्रिटिशांचे गॅझेट लागू केले गेले. मात्र, निजामांनी प्रसिद्ध केलेले गॅझेट लागू का होत नाही, यावरही विचार केला. ब्रिटिशांनी राज्य सोडून जाताना, त्यांनी त्याबाबतच्या नोंदी करून ठेवल्या. ब्रिटिशांच्या गॅझेटमध्ये नावांसह उल्लेख आहे. मात्र, निजामांच्या गॅझेटमध्ये नाव नसून, केवळ संख्या असल्याने, या अडचणी येत होत्या. मात्र, त्यावर तोडगा काढला.