

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
तालुक्याचे प्रमुख ठिकाण असलेले मालेगाव तहसील कार्यालय विविध समस्यांच्या गर्तेत अडकले असून, या कार्यालयातील सर्वच मजल्यांवरील स्वच्छतागृहे दुरुस्तीच्या नावाखाली अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे ग्रामीण भागांतून विविध सरकारी कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
विशेष म्हणजे ग्रामीण भागातून अनेक किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या महिलांना या ठिकाणी शौचालयाअभावी मोठी कुंचबणा सहन करावी लागत आहे. याच इमारतीत तहसीलदारांसह उपविभागीय अधिकारी, धान्य पुरवठा अधिकारी अशी विविध महत्त्वाची कार्यालये आहेत.
त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण तालुकाभरातून नागरिक आपल्या विविध कामांसाठी येत असतात. येथे दररोज हजारो नागरिकांची ये-जा असते. असे असताना येथे नागरिकांना सरकारीकामे तर दूरच पण मूलभूत सुविधांअभावी मोठी अडचण सहन करावी लागत आहे. या ठिकाणी महिलादेखील मोठ्या प्रमाणात येतात.
मात्र, येथे दुरुस्तीच्या नावाखाली शौचालये बंद आहे. हे काम अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्यामुळे ते कधी पूर्ण होणार याबाबत तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांनी तत्काळ दखल घेऊन संबंधित काम मार्गी लावून नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी होत आहे.
दादा मागायची कुणाकडे?
जनता कराच्या रूपाने सरकारला पैसा देते. मात्र, त्यातून बांधलेल्या 'तहसील' सारख्या प्रमुख इमारतीत नागरिकांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था होत नसेल, तर दादा कुणाकडे मागायची असा सवाल महिलांकडून केला जात आहे. या ठिकाणी येणाऱ्या महिलांना नवीन स्वच्छतागृह इमारतीच्या मागील बाजूस आवारात लघुशंकेसाठी जावे लागत आहे.
तहसील कार्यालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी स्वच्छता व पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसणे ही गंभीर बाब आहे. प्रशासनाने तातडीने काम पूर्ण करून नागरिकांची गैरसोय दूर करावी अन्यथा लोकशाही मार्गान आंदोलन केले जाईल.
सुशांत कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते