

light rain in the city; normal life disrupted
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात शुक्रवारी (दि.५) दिवसभर हलक्या ते मध्यम सरीसह पावसाने हजेरी लावली. पावसामुळे गंगापूर धरणाच्या जलपातळीत वाढ झाल्याने दोन हजार ३० क्यूसेक इतका विसर्ग नदीपात्रात करण्यात आला. त्यामुळे गोदाघाटावर नदीप्रवाहात मोठी वाढ झाली. नांद्रमधमेश्वर मधून सहा हजार ३१० क्यूसेक पाण्याचा विसर्ग जायकवाडीकडे झेपावत होता.
हवामान विभागाने शनिवारपर्यंत जिल्ह्याला 'यलो अलर्ट' दिला आहे. शुक्रवारी (दि.५) सकाळी १०.३० पर्यंत शहरात ५.१ तर जिल्ह्यात ८.५ इतकी पावसाची नोंद झाली. दिवसभर हलक्या ते मध्यम सरी कोसळत होत्या. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. नाशिकसह जिल्ह्यात पाऊस सुरू असल्याने सर्वच धरणसाठ्यातील जलपातळीत वाढ झाली. हवामान खात्याने जिल्ह्याला शनिवारी (दि.६) देखील यलो अलर्टचा इशारा दिला असून, पुढील २४ तासांत नाशिकसह जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे धरणातील जलसाठ्याच्या पातळीत वाढ होत असल्याने विसर्गात वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शनिवारी (दि. ६) गणेश विसर्जन होणार आहे. देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या भक्तांची सरींमुळे तारांबळ उडाली होती. पावसाने शहरातील बहुतांश भागातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली. मुख्य रस्त्यांसह विस्तारित वसाहतातील रस्ते चिखलमय झाले. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली.
शुक्रवारी (दि.५) दारणा धरणातून सुरू असलेला दोन हजार १९६ क्यूसेक विसर्ग दुपारी ३ वाजता दोन हजार चार ने वाढ करून तो चार हजार ६०० इतका करण्यात आल्याने दारणा नदीपात्रालगतच्या परिसरात सर्तकतेचा इशारा जलसंपदा विभागाने दिला. प्रशासकीय विभागांना योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही दिल्या आहेत.
त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा मागील पंधरा दिवसांपासून त्र्यंबकेश्वर येथे संततधार सुरू असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. जून महिन्यापासून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत २०२८ मिमी इतका पाऊस झाला आहे. हा पाऊस मागील वर्षांच्या सरासरीपेक्षा तब्बल १०५ टक्के जास्त असल्याचे प्रशासनाने सांगितले.
श्रावण महिना सरला आणि गणेशोत्सवाची सुरुवात झाली तरी आता पाचसात खंड पडेल अशी अपेक्षा होती. मात्र उलट पावसाचा वाढलेला जोर नागरिकांच्या त्राग्याचे कारण ठरत आहे.
सततच्या पावसामुळे येथील बाजारपेठ संकटात सापडली आहे. यात्रा-जत्रांवर अवलंबून असलेल्या व्यापाऱ्यांना यंदा तोटा पत्करावा लागत आहे. प्लास्टिकचे कव्हर, बरसाती व रेनकोट यांचा व्यवसाय वगळता इतर सर्व व्यवसायांना मंदीचा फटका बसला आहे.
गणेशोत्सवातही पावसाने रंगाचा वेरंग केला आहे. दिवसभरासह सायंकाळीही कोसळणाऱ्या पावसामुळे सार्वजनिक मंडळांनी सजावटीवर केलेला खर्च पाण्यात गेला आहे. सततच्या पावसामुळे दमट हवामान निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये आरोग्याच्या तक्रारी वाढीस लागल्या आहेत. शक्य असेल तेव्हा नागरिक हवापालटासाठी गावाबाहेर जात असल्याचेही दिसून येते.