

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
धुवाधार पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत केलेच, शिवाय अंबड एमआयडीसीतील उद्योगांचेही मोठे आर्थिक नुकसान केले. मुसळधार पावसामुळे शहरात तब्बल ५५ ठिकाणी झाडे उन्मळून पडली. त्यापैकी अंबड एमआयडीसी परिसरात चार मोठी झाडे वीजवाहिन्या आणि खांबांवर कोसळल्याने गुरुवारी (दि. २३) पहाटे ३ पासून सायंकाळी ७ पर्यंत संपूर्ण परिसर अंधारात राहिला.
परिणामी सुमारे ३५० उद्योगांचे उत्पादन पूर्णपणे ठप्प झाले असून, उद्योग क्षेत्राचे १०० कोटींहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी महावितरणचे वीज खांब उन्मळून पडले.
काही ठिकाणी डीपी उडाली, तर वीजवाहिन्यांमध्ये स्फोट होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे अंबड एमआयडीसीच्या निम्म्याहून अधिक औद्योगिक वसाहतीतील वीजपुरवठा खंडित झाला. उत्पादन प्रक्रिया पूर्णपणे विजेवर अवलंबून असल्याने अनेक कारखाने बंद ठेवावे लागले. याचा सर्वाधिक फटका लघु व मध्यम उद्योगांना बसला.
आधीच वाढत्या उत्पादन खर्च, कच्चा माल आणि स्पर्धेच्या संकटाचा सामना करणाऱ्या उद्योगांसमोर एका दिवसाचे उत्पादन बंद राहणेही मोठे आर्थिक संकट ठरत आहे. अनेक उद्योगांनी तयार मालाचा पुरवठा वेळेत न झाल्याने ग्राहकांकडून दंडात्मक कारवाईचीही भीती व्यक्त केली.
वीज नसल्यामुळे अनेक कंपन्यांमधील कामगारांना दिवसभर काम न मिळाल्याने घरी परत पाठवावे लागले. विशेषतः रोजंदारीवर काम करणाऱ्या शेकडो कामगारांचा दिवसाचा रोजगार बुडाला. उद्योग बंद असल्याने वाहतूक, पॅकिंग आणि इतर पूरक सेवांवरही परिणाम झाला. उद्योजकांनी महावितरणच्या पायाभूत सुविधांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
जुने झालेले वीज खांब, कमकुवत यंत्रणा, अपुरे मनुष्यबळ आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अत्याधुनिक उपकरणांचा अभाव यामुळे प्रत्येक मोठ्या पावसात औद्योगिक वसाहतींना अशाच संकटाचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. उद्योग संघटनांनी औद्योगिक क्षेत्रासाठी स्वतंत्र आपत्कालीन वीज दुरुस्ती पथक, आधुनिक यंत्रसामग्री आणि वीज वितरण व्यवस्थेचे तातडीने सक्षमीकरण करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले असून, रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, एका दिवसाच्या वीज खंडितमुळे उद्योगांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी काही दिवस लागणार असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.
"प्रत्येक पावसात महावितरणचा कारभार उघडा पडतो. वारंवार तक्रारी करूनदेखील महावितरणने आपल्या कारभारात सुधारणा केलेली नाही. जुनाट यंत्रणेवर महावितरण किती दिवस अवलंबून राहणार अन् उद्योगांचे नुकसान करणार? उद्योगांना झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्याची वेळ आता आमच्यावर आली आहे."
वींद्र झोपे, अध्यक्ष, ऊर्जा समिती 'आयमा'