नाशिक : सोने-चांदी या मौल्यवान धातूंवरील आयातशुल्क कमी केल्याने, सोने- चांदी दर आटोक्यात आले होते. मात्र, आता पुन्हा एकदा सोने-चांदीने उच्चांकी दराकडे वाटचाल केली आहे. सोने ७५ हजारांच्या पार गेले असून, दररोजची दरवाढ बघता चांदी पुढच्या काही दिवसांत लाखाचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. गेल्या 10 दिवसांचा विचार केल्यास चांदीत सात हजारांची घसघशीत वाढ झाली असून, सोने दोन हजारांपेक्षा अधिक महाग झाले आहे.
२४ कॅरेट प्रति दहा ग्रॅम - ७४ हजार ९२०
२२ कॅरेट प्रति दहा ग्रॅम - ६८ हजार ६८०
चांदी प्रति किलो - ९२ हजार
गेल्या अर्थसंकल्पात सोन्यावरील आयातशुल्कात तब्बल सहा टक्क्यांनी कपात केल्यामुळे, सोने आणि चांदीच्या दरात कमालीची घसरण बघावयास मिळाली. अर्थसंकल्पापर्यंत सोने दर ७३ हजारांपेक्षा अधिक होता. मात्र, आयातशुल्क कमी करण्याची घोषणा करताच २४ कॅरेट सोने दर प्रतिदहा ग्रॅमसाठी ६८ हजार 500 रुपयांवर आला होता. चांदीतही त्यावेळी मोठी घसरण झाली होती. ८९ हजारांवरून थेट ८३ हजारांवर पोहोचली होती. त्यानंतरही सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने घसरण बघावयास मिळाली. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर घडत असलेल्या घडामोडींमुळे पुन्हा एकदा सोने-चांदीच्या दराने उच्चांकांकडे वाटचाल सुरू केली आहे. गेल्या 10 दिवसांमधील दरांचे विचार केल्यास, २४ कॅरेट सोन्याचा दर प्रतिदहा ग्रॅमसाठी ७२ हजार ७९० रुपये इतका होता. त्यात तब्बल २,१३० रुपयांची वाढ होऊन, ७४ हजार ९२० रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. 10 दिवसांपूर्वी चांदीचा दर प्रतिकिलो ८५ हजार रुपये इतका होता. सद्यस्थितीत तो ९२ हजारांवर पोहोचला असून, त्यात तब्बल सात हजारांची वाढ झाली आहे. चांदीतील वाढ विचारात घेता, लवकरच चांदी एक लाखाचा टप्पा गाठेल अशी शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
गेल्या 10 दिवसांमधील सोने-चांंदीच्या दरांचा विचार केल्यास त्यात दररोज चढउतार बघावयास मिळत आहे. ५ सप्टेंबर रोजी सोने दर ७२ हजार ७९० रुपये इतका नोंदविला गेला. ६ सप्टेंबर रोजी त्यात वाढ होऊन तो ७३ हजार ३४० रुपयांवर पोहोचला. ७ सप्टेंबर रोजी पुन्हा घसरण होऊन, ७२ हजार 900 रुपयांवर आला. त्यानंतर पुढील चार दिवस सलग त्यात वाढ होऊन दर ७३ हजार २८० रुपयांवर पोहोचला. त्यानंतर पुन्हा त्यात घसरण झाली. १४ सप्टेंबर रोजी सोने दर ७४ हजार ९२० रुपये इतका नोंदविला गेला. चांदीत मात्र ७ सप्टेंबरचा अपवाद वगळता ५ ते १५ सप्टेंबरपर्यंत दरात सतत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
जागतिक स्तरावरील बेरोजगारीचा अहवाल, आर्थिक महामंदी आणि युद्धजन्य परिस्थिती यामुळे सोने बाजारात अनिश्चिता निर्माण झाली आहे. दिवाळीपर्यंत सोने ८० हजार, तर चांंदी एक लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. दर वाढणार या भीतीने ग्राहकांकडून आताच सोने खरेदी केले जात आहे.
- चेतन राजापूरकर, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, आयबीजे