

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
गोदाघाटावर देश-विदेशातून येणारे भाविक श्रद्धेने निर्माल्य पाण्यात विसर्जित करतात. वाढते प्रदूषण लक्षात घेऊन प्रशासनाने निर्माल्य थेट पाण्यात जाणार नाही, यासाठी बॅरिकेडिंगची व्यवस्था केली आहे. दिवसभरात शेकडो किलो निर्माल्य जमा करीत ते स्वतंत्रपणे व्यवस्थापित केले जात असल्याचे सांगितले जाते.
मात्र, दुसरीकडे गोदाघाट परिसरात कपडे धुणे आणि वाहन धुण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याचे चित्र आहे. गोदापात्रात साबणाचा फेस तरंगताना दिसत आहे. काही ठिकाणी वाहन धुण्यासाठी पैसे घेऊन सेवा दिली जात असल्याची माहिती आहे.
वाहनांमधून निघणारे रासायनिक पदार्थ थेट पाण्यात मिसळत असल्याने प्रक्षणाचा धोका अधिक वाढत आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधींचा निधी मंजूर झाल्याची चर्चा असताना, प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या बाबींवर कठोर निर्बंध का लादले जात नाहीत, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
गोदाघाटाच्या विविध कामांवर श्रेयवाद सुरू असताना, प्रत्यक्ष प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना का होत नाहीत, याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे . उच्च न्यायालयाने वाहन गोदाघाटापर्यंत उच्च न्यायालयाने यापूर्वीच कोणतेही वाहन गोदाघाटापर्यंत येऊ देवू नये पोलिस बंदोबस्ताची व्यवस्था ठेवावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
मात्र, या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही त्यास संबंधित यंत्रणा जबाबदार आहे. यासंदर्भात आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याबाबत महापालिका व पोलिस कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी. - राजेश पंडित, याचिकाकर्ते