

नाशिक: येत्या २०३० पर्यंत भारताचे उत्पादन क्षेत्र मोठ्या परिवर्तनासाठी सज्ज झाले असून जीडीपीमध्ये या क्षेत्राचा वाटा जवळजवळ दुप्पट राहील, असा अंदाज औद्योगिक दृष्टिकोन या अहवालात व्यक्त करण्यात आलेला आहे. जागतिक पुरवठा साखळींशी भारताचा उत्तमप्रकारे झालेला मिलाफ, सरकारचे धोरणात्मक पाठबळ आणि चीनवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दीर्घकालीन प्रवाहामुळे २०३० मध्ये उत्पादन क्षेत्राचा वाटा भारताच्या जीडीपीत सुमारे एक पंचमाश इतका राहणार आहे.
कोविडनंतरच्या काळात कंपन्यांनी उत्पादनात सावधगिरी बाळगली होती. परंतु त्यांनी अतिशय जोरदारपणे भांडवली गुंतवणूक केल्याने औद्योगिक उत्पादनाने जोरदार उसळी घेतली आहे. औद्योगिक उत्पादनातील ही उसळी अलिकडच्या काही दशकातील सर्वाधिक सक्षम अशा औद्योगिक फेरभरारीपैकी एक असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. इक्विरस कॅपिटलतर्फे अहवालात सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
भारताच्या जीडीपीमध्ये उत्पादन क्षेत्राचा वाटा आर्थिक वर्ष २०२५ मध्ये १३ टक्के आहे. तो आर्थिक वर्ष २०३० पर्यंत तब्बल २० टक्क्यांपर्यंत वाढेल. मागणीत जोरदार वाढ, धोरणात्मक सुधारणा आणि पुर्वपदावर आलेल्या जागतिक पुरवठा साखळीमुळे ही वाढ होणार असल्याचा अंदाज आपल्या अहवालात व्यक्त केला आहे.
जागतिक पातळीवरील भू-राजकीय गुंतागुंतीमुळे टॅरिफ आणि नॉन-टॅरिफसारखे अडथळे उभे ठाकलेले आहे. तरीही पीएलआय, गती शक्ती आणि पायाभूत सुविधांचे विस्तारीकरण यासारख्या सुधारणांमुळे उत्पादन क्षेत्र विकासाचा मुख्य आधारस्तंभ बनला आहे. यातून येत्या काही वर्षांत भांडवली खर्चात सातत्य राहून सखोल संरचनात्मक लाभाचा पाया घातला गेल्याची टिप्पणी इक्विरस कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक मुनीश अग्रवाल यांनी केली आहे. शेअर जाराच्या कामगिरीत हा आशावाद ठळकपणे दिसून येतो: जुलै २०२२ पासून बीएसई इंडस्ट्रियल्स इंडेक्सने सेन्सेक्स आणि इतर क्षेत्रीय निर्देशांकांपेक्षा (एफएमसीजी, आरोग्यसेवा, आयटी, वित्तीय सेवा) दमदार कामगिरी बजावलेली आहे
आयपीओ उलाढालीत वाढ
आर्थिक वर्ष २०२५ मध्ये औद्योगिक कंपन्यांच्या आयपीओने पाच वर्षांतील उच्चांक नोंदविला आहे. या वर्षात ३२ कंपन्यांचे आयपीओ नोंदणीकृत झाले. कोविड-पूर्व काळापेक्षाही ही वाढ अतिशय लक्षणीय ठरली आहे. भांडवल उभारणीच्या बाबतीतही आर्थिक वर्ष २०२५ हे विक्रमी वर्ष ठरले. या वर्षात औद्योगिक कंपन्यांच्या आयपीओद्वारे विक्रमी ६६३.२ अब्ज रुपये भांडवल उभारले गेले. आर्थिक वर्ष २४ हीच रक्कम १७० अब्ज रुपये इतकी होती.
आयपीओच्या संख्येमध्ये औद्योगिक कंपन्यांचा वाटा गेल्या वर्षीच्या ३० टक्क्यांवरून यंदा सुमारे ४० टक्क्यांवर पोहचला आहे. विलीनीकरण आणि अधिग्रहण तसेच पीई गुंतवणूक देखील पाच वर्षांत उच्चांकी १,४३२.८ अब्ज रुपयांवर पोहोचली आहे. ही गुंतवणूक २०२० मध्ये ५०८.२ अब्ज रुपये आणि २०२४ मध्ये ८०७.३ अब्ज रुपये इतकी होती.
ईव्ही, इलेक्ट्रॉनिक्स आणि सिमेंट क्षेत्रात भविष्यातील वाढीच्या टप्प्याला आकार देईल, अशी अपेक्षा आहे, तर आर्थिक वर्ष २०३० पर्यंत पॅकेजिंग, एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात पीई गुंतवणूकीवर अधिक भर राहण्याची शक्यता आहे.
तीन औद्योगिक संकल्पनांवर नजर
एरोस्पेस आणि संरक्षण: सर्वाधिक वेगाने वाढणारी पीई/व्हीसी संकल्पना (~१०० टक्के वार्षिक चक्रवाढ वृध्दी अर्थात सीएजीआर).
अक्षय ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरी: पीएम ई-ड्राइव्ह, पीएलआय आणि स्वच्छ-तंत्रज्ञानाच्या मागणीमुळे भांडवलला आपल्याकडे आकर्षित करण्यात हे क्षेत्र अग्रस्थानी राहणार
ऑटोमेशन, रोबोटिक्स आणि एआय इंटिग्रेशन: औद्योगिक क्षेत्रांमध्ये डीप-टेक आणि मशीन लर्निंगशी एकत्रीकरणीची प्रक्रिया होताना दिसेल आणि छोट्या उत्पादक कंपन्यामध्ये रोबोटिक्सचा वापर वाढेल.