देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे विलीनीकरण नाशिक महापालिकेमध्ये होणार असल्याने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डातील भाजपचे माजी नगरसेवक शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार असून या सबंधाने त्यांची जिल्हा पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे
देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डात गत पंचवार्षिकमध्ये भाजपची एकहाती सत्ता होती. आठपैकी सहा नगरसेवक भाजपचे तर एक नगरसेवक मित्रपक्ष रिपाईचा होता. राहिलेला एक नगरसेवक शिवसेना गटाचा होता. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे विलीनीकरण महानगरपालिकेत होणार असल्याने येथील राजकीय समीकरणे बदलली गेली आहेत. त्या दृष्टिकोनातून केंद्र व राज्य सरकारने कृती कार्यक्रम जाहीर करून त्याची प्रशासकीय पातळीवर अंमलबजावणी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता असून विधानसभेनंतर महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत.
नाशिक महापालिकेत कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश झाल्यानंतर येथील अंदाजे 45 हजार मतदार संख्या मनापाकडे वर्ग होणार आहे. त्यामुळे प्रभाग संख्या वाढणार आहे. नाशिक महापालिकेची आगामी निवडणूक लढविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लोकसभेला महाविकास आघाडीला मिळालेले यश व ठाकरे गटाचा झालेला खासदार यामुळे या पक्षाकडे प्रवेश करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डातील भाजपच्या काही नगरसेवकांचे ठाकरे गटातील नेत्यांशी जवळचे संबंध आहेत. आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्यासाठी प्राथमिक चर्चा केली आहे. कॅन्टोन्मेंटप्रमाणे महापालिकेतही नगरसेवक होण्याची इच्छा बाळगून असणाऱ्यांनी आत्ताच आपली राजकीय गणिते जुळविण्यास सुरुवात केली आहे.
मुळात भगूर-देवळाली या परिसरात भाजपचा जनाधार हा अत्यल्प असताना कॅन्टोन्मेंट नगरसेवकांमुळे तो बऱ्यापैकी वधारला होता. पक्षीय पातळीवर गेल्या 25 वर्षापासून भाजपला आपला जम येथे बसवता आला नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यातच ज्यांच्या माध्यमातून भाजपचा झेंडा येथे रोवला गेला, तेच नगरसेवक जर भाजप सोडून इतर पक्षात जाणार असतील, तर त्याची दखल भाजपच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे. अन्यथा या भागातून भाजपला पुन्हा पूर्वीचे दिवस बघावे लागतील, हे सत्य कोणी नाकारू शकत नाही.