नाशिक : नाशिकमध्ये आम्ही सर्व छत्रपतींचे मावळे विविध विकासकामांनिमित्त एकत्र आलो आहोत. आम्हाला 'एक महाराष्ट्र, श्रेष्ठ महाराष्ट्र' या संकल्पनेच्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. क्रांतिसूर्य जोतिबा फुले यांनी दाखवलेला समतेचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेला संविधानाचा मार्ग राज्यातील महायुती सरकारने स्वीकारला आहे. त्या मार्गावरून आम्ही सगळे छत्रपतींचे मावळे मार्गक्रमण करत आहोत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis, Deputy Chief Minister of Maharashtra) यांनी केले.
क्रांतिसूर्य जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्याच्या अर्धपुतळ्याचे अनावरण प्रसंगी ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले की, नाशिकमध्ये उभारण्यात आलेले क्रांतिसूर्य फुले व सावित्रीबाई फुले यांचे भव्य शिल्प कदाचित संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशातही कुठेही नसावे. क्रांतिसूर्य फुले यांनी समाजातील पिचलेली व्यक्ती व शेवटच्या घटकातील माणसाचा विचार करून दबलेल्या माणसाला समाजात ताठ मानेने उभे करण्याचे काम केले आहे. अशा प्रकारे समाजाला सुधारण्याचे काम फुले दाम्पत्याने केले. देशातील समाजामध्ये विषमता होती, महिलांना हिणवले जात होते व किंमत दिली जात नव्हती. त्यांना संघर्षातून उभे करण्याचे काम क्रांतिसूर्य फुलेंनी केले. त्या काळी महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. यावर मात करत सावित्रीबाई फुले या महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांच्यामुळेच आज महिला पुढे जात असल्याचे त्यांनी सांगितले.