

Democracy is strengthened by respect for common people collector
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आणीबाणीत कारावास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येत आहे. अशा प्रकारचे उपक्रम भारतीय लोकशाही आणखी सक्षम आणि बळकट करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तसेच राज्य शासनाने आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले.
देशात आणीबाणी लागू झालेल्या घटनेस ५० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात बुधवारी (दि. २५) आणीबाणीत कारावास भोगलेल्या व्यक्तींचा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाच्या वतीने गौरव करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा माहिती अधिकारी गोपाळ साळुंखे, नायब तहसीलदार नरेंद्र जगताप, लोकतंत्र सेनानी संघाचे अध्यक्ष एकनाथ शेटे, उपाध्यक्ष सुरेश सायखेडकर, रमाकांत कुलकर्णी यांच्यासह आणीबाणीत कारावास भोगलेल्या व्यक्ती आणि त्यांचे वारस उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शर्मा यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे गौरवपत्र, गुलाबपुष्प देऊन कारावास भोगलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाची पाहणी जिल्हाधिकारी शर्मा यांच्यासह मान्यवरांनी केली. यावेळी शेटे, भानुदास येवला, दिनकर देशमुख, जयश्री कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी, रमाकांत भावसार, दामोदर गौरकर आदींनी मनोगत व्यक्त केले. निवासी उपजिल्हाधिकारी वाघ यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा माहिती अधिकारी साळुंखे यांनी आभार मानले.
सत्कार सोहळ्यास धुंडिराज होनप यांच्यासह अन्य एक वयोवृद्ध व्यक्ती जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्यावरील मुख्यमंत्री सहायता कक्ष येथे थांबले होते. जिल्हाधिकारी शर्मा यांनी तेथे जाऊन होनप यांचा सत्कार केला. त्यामुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेचे उपस्थित नागरिकांनी कौतुक केले.