

नाशिक : नाशिकसह राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली. जिल्हाधिकारीत नुकसान आढावा बैठकीत ते बोलत होते.
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित कुटुंबांना प्रशासनाच्या माध्यमातून तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी. वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी पथके नियुक्त करावीत असे निर्देश त्यांनी दिले तसेच राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. अतिवृष्टीमुळे बाधितांना तातडीने मदत दिली जात आहे. वीज तारा, नादुरुस्त ट्रान्स्फॉर्मर बदलून वीजपुरवठा पूर्ववत करावा. पडझड झालेली घरे व शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने अहवाल सादर करावा. बहुतांश नदी-नाल्यांना आलेला पूर ओसरल्यानंतर उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य आणि पशुसंवर्धन विभागाने दक्षता घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात. त्यासाठी औषधसाठा उपलब्ध करून घ्यावा. ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळेल याची ग्रामपंचायतीने काळजी घ्यावी तसेच खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशा सूचनाही मंत्री भुसे यांनी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा सादर केला. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासन सतर्क आहे. सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले. बैठकीस माजी खासदार हेमंत गोडसे, सामाजिक कार्यकर्ते अजय बोरस्ते आदी उपस्थित होते.