नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क ; राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा आरक्षण वाद रंगला असतानाच, त्यापाठोपाठ आता आदिवासी विरुद्ध धनगर समाज असा वाद रंगला आहे. धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण देण्यासंदर्भात मागणी होत आहे. मात्र, दुसरीकडे आदिवासी नेत्यांकडून, धनगर समाजाची ही घुसखोरी असल्याचे म्हणत याला कडाडून विरोध आहे.
अशातच आता धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यास अजित पवार गटाचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी विरोध दर्शवत धरणे आंदोलन करण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे.
सरकारने धनगरांना आदिवासीतून आरक्षण देण्याचा जीआर काढण्याची भूमिका मागे घ्यावी तसेच पेसाभरती बाबत दिलेले आश्वासन पाळावे या मागणीसाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ सोमवार दि. 30 पासून मुंबई मंत्रालया समोर गांधी पुतळ्या शेजारी धरणे आंदोलनास बसणार आहे. यात सर्व आदिवासी आजी- माजी आमदार, विविध लोक प्रतिनिधी संघटना यांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.