

देवळाली कॅम्प (नाशिक) : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची जन्मभूमी असलेल्या भगूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. प्रशासनाकडून तयार करण्यात आलेली मतदारयादी मोठ्या प्रमाणावर गोंधळाची व चुकीची असल्याचा आरोप पक्षाच्या जिल्हाध्यक्षांसह भगूर-देवळाली मंडल अध्यक्षांनी केला असून, राज्यातील सत्ताधारी पक्षानेच शासकीय यंत्रणेवर आरोप केल्याने अनेक तर्क वितर्कांना उधाण आले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, नाशिक जिल्ह्यातील भगूर, सिन्नर, ओझर, येवला, पिंपळगाव बसवंत, चांदवड, इगतपुरी, सटाणा, त्र्यंबकेश्वर आणि नांदगाव या नगर परिषदांच्या पंचवार्षिक निवडणुका लवकरच होऊ घातल्या आहेत. त्यासाठी प्रशासनाकडून प्रारूप मतदारयादी घोषित करून हरकतीसाठी दि. ३१ ऑगस्ट पर्यंतची मुदतही दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर, भगूर नगर परिषदेची मतदारयादी चुकीची असल्याचा आरोप भाजपचे भगूर- देवळाली मंडल अध्यक्ष प्रसाद आडके यांनी केला असून, जिल्हाध्यक्ष प्रा. सुनील बच्छाव यांनीही जिल्हा प्रशासनाला याबाबत सूचना केलेल्या आहेत. भाजपने या संदर्भात देवळालीच्या निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, मतदारयादीतील त्रुटी दूर करण्याची मागणी केली आहे.
भगूर नगर परिषदेची मतदारयादी सन २०११ च्या जनगणनेनुसार तयार करण्यात येत आहे. या जनगणनेनुसार भगूरची एकूण लोकसंख्या १२ हजार ३५३ इतकी आहे. परंतु, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या कमी मतदानाचा संदर्भ देत, मतदार यादीत ४० टक्के मतदारांची नावे बोगस, दुबार किंवा मृत व्यक्तींची असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
भाजपने केलेल्या पाहणीत, भगूर नगर परिषद हद्दीतील १३ बूथपैकी (क्रमांक २५७ ते २६९) अनेक ठिकाणी बनावट घर क्रमांक, भाडेकरूंची दुबार नावे आणि मृत व्यक्तींची नावे समाविष्ट असल्याचे आढळले आहे. विशेषतः रिकाम्या भूखंडावर (बखळ जागेवर) सुद्धा मतदारांची नोंदणी केलेली दिसून आली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया संशयास्पद असल्याचा आरोप भाजप देवळाली- भगूर मंडल अध्यक्ष प्रसाद आडके, उपाध्यक्ष नीलेश हासे यांनी केला आहे. तसेच प्रशासनाने मतदारयादीमध्ये लवकरात लवकर दुरुस्ती करावी अन्यथा पक्षाच्या वतीने भगूर नगर परिषदेविरोधात मोठे जनआंदोलन केले जाईल, असा इशाराही दिला आहे
मतदारयादीतील नावांची ओळख आधार कार्डनुसार करावी.
एकाच घर क्रमांकाची नावे वेगवेगळ्या बूथमध्ये आढळली आहेत, ती दुरुस्त करावीत.
रिकाम्या जागेवरील नोंदणी केलेले मतदार, त्यांच्या मूळ पत्त्यानुसार संबंधित यादी भागात समाविष्ट करावीत.
एकाच घर क्रमांकावर किती नावे असावीत, याची तपासणी करावी.
सुमारे १५०० मतदारांना घर क्रमांक दिलेला नाही, त्यामुळे त्यांची ओळख पटविणे कठीण झाले आहे. अशा मतदारांच्या नावांसाठी योग्य घर क्रमांक नोंदवावा.