

सटाणा : पुढारी वृत्तसेवा
बागलाण तालुक्यातील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसह तत्काळ भरीव मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्षराजेंद्र सोनवणे यांनी शिष्टमंडळासह महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नाशिक येथील भेटीत केली. बावनकुळे यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देत अपेक्षित कार्यवाही करण्याची सूचना केली.
तालुक्यात गेल्या ४-५ दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. नाशिक येथे आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमादरम्यान तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी मंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन या परिस्थितीची सविस्तर माहिती दिली.
सटाणा, मुल्हेर, ताहराबाद, नामपूरसह अनेक गावांत वादळी पाऊस व गारपिटीमुळे कांदा, गहू, हरभरा, मका तसेच भाजीपाला व फळबागांचे मोठे नुकसान झाले असून, उभे पीक आडवे झाले व पाणी साचल्याने पिके कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. कांदा काढणीस आलेला असताना, पावसामुळे भिजून सडण्याचा धोका निर्माण झाला असून, गहू झोपल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
हरभरा व मका पिकांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे कर्जबाजारी शेतकरी आर्थिक संकटात सापडून उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. शासनाने तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, कर्जमाफी लागू करावी तसेच विविध योजनांचा लाभ वाढवावा, अशी मागणी करीत नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित बागलाण तालुक्यासाठी त्वरित ठोस निर्णय घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
यावेळी सोनवणे यांच्यासह किसान सेल जिल्हाउपाध्यक्ष खेमराज कोर, फईम शेख, भारत खैरनार, संदीप भामरे, पांडुरंग सोनवणे, रामूतात्या सोनवणे, भिका सोनवणे, झिपरू सोनवणे, नारायण सोनवणे, गायत्री कापडणीस, सुरेखा बच्छाव, रणधीर मोरे, नंदराज देवरे, दिगंबर सोनवणे, तुषार वाघ, आर. टी. सोनवणे, अशोक भामरे, यासीर शेख, दिलीप खैरनार, प्रसाद दळवी, प्रकाश अहिरे, अनिल पाटील, डॉ. विठ्ठल येवलकर, हेमंत मगर, यशवंत कात्रे, केशवराव सोनवणे, आप्पा नंदाळे, भारत खैरनार, किशोर व्हाळीज, संदीप भामरे, रणधीर मोरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.