

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क | डॉ. जयंत विष्णू जयंत नारळीकर (Dr Jayant Vishnu Narlikar) आणि नाशिक यांच्यातील जवळकीचा संबंध म्हणजे, 2021 साली नाशिक येथे झालेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद नारळीकर यांनी भूषवले होते. त्यांनी संमेलनाचे अध्यक्षीय भाषण दिले. ज्यात त्यांनी विज्ञान आणि साहित्य यावर भाष्य केले होते.
नाशिक शहरात होऊ घातलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने ज्येष्ठ विज्ञान लेखक जयंत नारळीकर यांची एकमताने निवड करण्यात आली होती. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या फार्मसी कॉलेज मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत रविवारी ( 24 जानेवारी 2021) रोजी ही घोषणा केली होती. साहित्य महामंडळाची मागदर्शन निवड समितीची यावेळी कार्यक्रमाची रुपरेशा ठरविण्यात आली. गंगापूर रोड वरील एका मंगल कार्यालयात अध्यक्ष निवडीसाठी यावेळी घेण्यात आलेल्या बैठकीत प्राचार्य कौतिकराव ठाले- पाटील, औरंगाबाद, डॉ. दादा गोरे औरंगाबाद, डॉ. रामचंद्र काळूंखे, औरंगाबाद, मिलिंद जोशी, पुणे, प्रकाश पायगुडे, पुणे, सुनिता राजे पवार, पुणे, प्राचार्य उषा तांबे, मुंबई, प्रतिभा सराफ, मुंबई, श्रीमती उज्वला मेहंदळे, मुंबई, विलास मानेकर, नागपूर, प्रदीप दाते, वर्धा, गजानन नारे, प्रसाद देशपांडे, बडोदा, सप्रे, भोपाळ, विद्या देवधर, हैद्राबाद, कपूर वासनिक, विलासपुर, भालचंद्र शिंदे, गुलबरगा व उस्मानाबाद येथे झालेल्या साहित्य संमेलनमाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो हे सदस्य यांची उपस्थिती लाभली होती.
सकाळी ११ वाजता बैठकीला सुरुवात करण्यात आल्यानंतर लोकहितवादी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मुख्य चर्चेला सुरुवात करण्यात आली. यावेळी भारत सासणे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र ज्येष्ठ साहित्यिक जयंत नारळीकर यांचे नव चर्चेला आल्यानंतर त्यांचे नाव मागे पडले. यातील दहा लोकांनी जयंत नारळीकरांच्या नावाचा आग्रह धरला तर काही लोकांनी भरत सासणे हे गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत असल्याने त्यांच्या नावाचा आग्रह धरला. शेवटी मात्र लेखकांची ज्येष्ठता व साहित्यमुल्य लक्षात घेता जयंत नारळीकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती.