

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा ध्वजपर्व तीन महिन्यांवर आले असताना शासन केवळ घोषणांचा पाऊस पाडत आहे. त्यातही आखाड्यांना पाच कोटी आणि आश्रमांना अवघे १५ लाख रुपयांचा निधी देणार असल्याचे जाहीर केले आहे. आखाडे आणि आश्रमात मोठी तफावत ठेवताना कोणाचे समाधान विचारात घेतले, असा खोचक प्रश्न डॉ. बिंदू महाराज यांनी शासनास विचारला आहे.
सलग तीन सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात सहभाग घेतलेल्या डॉ. बिंदू महाराज हे मध्यंतरी काही वर्षे प्रकृती अस्वास्थ्याने नियोजनात नव्हते. पेगलवाडी फाटा येथील बिंदूजी धाम येथे वास्तव्यास आहेत. कुंभमेळा नियोजनाचा प्रदीर्घ अनुभव असलेले डॉ. बिंदूजी महाराज यांनी नियोजनाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
१९९१ च्या कुंभमेळ्यात सर्वप्रथम शासनाचा निधी मिळवण्यात साधू-महंतांना यश आले. त्यात डॉ. बिंदूजी महाराज अग्रभागी होते. मागच्या सिंहस्थात आखाड्यांना ४ आणि आश्रमांना २ निवाराशेड देण्यात आले. यावेळी मात्र एका आखाड्याला पाच कोटी, तर आश्रमाला अवघे १५ लाख रुपये शासनाने जाहीर केले. त्यात आश्रम आणि मठात काय सोयी-सुविधा करायच्या याचे मार्गदर्शन शासनाने करावे, अशी अपेक्षा डॉ. बिंदू महाराज यांनी केली.
बडा उदासीन आखाड्याचे श्रीमहंत दुर्गादास महाराज यांच्या मार्गदर्शनाने आखाडा सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन करत आहे. याबाबत गैरसमज निर्माण करण्याचा कोणीही प्रयत्न करण्याची गरज नाही. आखाड्यांना ५ कोटी निधी देताना आश्रमांना १५ लाख रुपये हा विरोधाभास दूर करा.
- डॉ. बिंदू महाराज, बडा उदासीन आखाडा