नाशिक : तुम्ही खात असलेली लालचुटूक फळे आणि हिरवीगार भाजी खरोखरच ताजी आहे की रासायनिक विष ? जास्त नफ्याच्या लोभापोटी ग्राहकांच्या जिवाशी खेळणाऱ्या भेसळखोर व्यापाऱ्यांवर आता प्रशासनाने थेट हल्लाबोल केला आहे. फळे कृत्रिमरीत्या पिकवणे, त्यांना गोड बनवण्यासाठी इंजेक्शन देणे, भाज्यांना रासायनिक रंग लावणे आणि अन्नधान्यात भेसळ करणे... या सगळ्या भयंकर प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने बाजार समित्यांना कडक शब्दांत दम भरला आहे. आता अशा व्यापाऱ्यांना थेट घरचा रस्ता दाखवला जाणार आहे.
राज्यातील बाजार समित्या, खासगी बाजार आणि थेट पणन परवानाधारकांच्या आवारात खरेदी-विक्री होणाऱ्या शेतमालातील भेसळ व घातक रासायनिक प्रक्रियांना प्रतिबंध करण्यासाठी सहकार व पणन विभागाकडून महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
शेतमालाची गोडी वाढवण्यासाठी, फळे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी किंवा शेतीमाल आकर्षक दिसावा म्हणून केल्या जाणाऱ्या रसायनांच्या वापरास आळा घालण्याचे स्पष्ट निर्देश सर्व सक्षम प्राधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ च्या चौकटीत राहून शेतकरी व ग्राहकांची फसवणूक थांबवणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे.
दोषी आढळल्यास ही होणार कारवाई.. थेट परवाना रद्द होणार :
बाजारात विकल्या जाणाऱ्या फळ-भाजीपाल्यात जरा जरी भेसळ किंवा घातक रसायने आढळली, तर संबंधित व्यापाऱ्याचा परवाना जागीच रद्द केला जाईल. त्याला बाजारातून हाकलून दिले जाईल. एफडीए आणि पोलिसांची धाड : संशय येताच अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि पोलिस पथक गोदामांवर धाडी टाकणार. 'अन्नसुरक्षा कायद्यानुसार' दोषींवर थेट गुन्हे दाखल करून कडक कारवाई केली जाईल. प्लास्टिक वापरल्यास दंड: बंदी असलेले प्लास्टिक आणि थर्माकोल वापरणाऱ्यांची गय केली जाणार नाही. पर्यावरणपूरक सामान न वापरल्यास मोठा दंड ठोकला जाईल. वजनमापांत फसवणूक थांबणार : ग्राहकांना किंवा शेतकऱ्यांना वजनात फसवणाऱ्या व्यापाऱ्यावरही तत्काळ धडक कारवाई केली जाणार आहे.