Nashik Accident : बेशिस्त वाहनधारक पादचाऱ्यांच्या मुळावर, 11 महिन्यात ४५ जणांचा अपघाती मृत्यू | पुढारी

Nashik Accident : बेशिस्त वाहनधारक पादचाऱ्यांच्या मुळावर, 11 महिन्यात ४५ जणांचा अपघाती मृत्यू

नाशिक : गौरव अहिरे

शहरात जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत अपघातांमध्ये १७१ नागरिकांचा मृत्यू झाला असून ४२२ नागरिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सर्वाधिक १०६ दुचाकीस्वारांचा समावेश असून त्याखालोखाल ४५ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांमुळे शहरातील रस्त्यांवरून पायी चालणेही धोकादायक असल्याचे चित्र आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे सर्वाधिक अपघात होत असतात. वेगाने वाहने चालवणे, वाहतूक नियम न पाळणे यामुळे अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे तसेच अनेक जण जखमी झाले असून काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. चालू वर्षात शहरात ४२६ अपघात झाले असून त्यात १७१ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये २१ महिला व १५० पुरुषांचा समावेश आहे. तसेच ३२२ गंभीर जखमी झाले तर १०० जण किरकोळ स्वरुपात जखमी झाले आहेत. सर्वाधिक ८६ अपघात शहरातील कॉलनी रोड, इतर रस्त्यांवर झाले असून तर राष्ट्रीय महामार्गांवर ७१ आणि राज्य महामार्गावर ५ अपघात झाल्याची नोंद आहे. दरम्यान, वेगवान दुचाकी चालवण्यासोबतच सुरक्षीततेसाठी असलेले हेल्मेट न घातल्याने १०६ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. तर रस्ता ओलांडताना, कडेला उभ्या असलेल्या किंवा पायी चालणाऱ्यांना वाहनांनी धडक दिल्याने ४५ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील रस्ते पादचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत असल्याचे चित्र आहे.

अपघाती मृत्यू असे

स्वरुप मृत्यू जखमी
दुचाकीस्वार 106 269
पादचारी 45 93
सायकलस्वार 6 3
हलकी वाहने 6 34
रिक्षा चालक-प्रवासी 5 17
ट्रकचालक-क्लिनर 2 6
ट्रॅक्टर प्रवासी 1 0

Back to top button