नाशिक : तृतीयपंथीयांनी केली आरक्षणाची मागणी
कळवण, पुढारी वृत्तसेवा : राज्यात विविध समाज आरक्षणासाठी संघर्ष करीत असतांना आता आरक्षणाच्या या लढाईमध्ये तृतीयपंथीयांनी उडी घेतली आहे. आम्हालाही सरकारने आरक्षण द्यावे, अशी मागणी तृतीयपंथीयांच्या विविध आखड्यांच्या प्रमुखांनी केली. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त नाशिकच्या सप्तशृंग गडावर आज (दि.२८) देशभरातील तृतीयपंथीयांनी हजेरी लावली. त्या निमित्ताने आरक्षणाची मागणी पुढे आली आहे.
आज विविध जाती धर्माकडून आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे. मात्र, आम्ही किन्नर खऱ्या अर्थाने उपेक्षित आहोत. कुटुंबासह समाजाने आम्हाला आम्हाला वाळीत टाकले आहे. आमचा संघर्ष मोठा आहे. जगात अडीच जाती आहे. मानवाने अनेक जाती निर्माण केल्या. आमची अर्ध्या जातीकडे कोणीही लक्ष देत नाही. शासनाने आम्हालाही आरक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणावे. आम्ही जर आंदोलन केले तर ते शासनाला परवडणारा नाही, असा इशाराही तृतीयपंथीयांनी दिला आहे.