

कळवण : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने कळवण नगरपंचायतीतर्फे शहरात विशेष प्लास्टिक बंदी जनजागृती व तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान व्यापारी, व्यावसायिक आस्थापना, हॉटेल, भाजीविक्रेते तसेच इतर व्यावसायिकांची तपासणी केली.
प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करून सुमारे ३० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले. तसेच संबंधितांकडून एकूण ३,५०० रु. इतका दंड वसूल करण्यात आला.
मोहिमेदरम्यान व्यापारी व नागरिकांना एकदाच वापरल्या जाणाऱ्या (सिंगल यूज) प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले. त्याऐवजी कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. प्लास्टिक बंदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भविष्यातही नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही नगरपंचायतीने दिला.
नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नागेश येवले यांनी नागरिक व व्यापाऱ्यांनी पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार करून स्वच्छ, सुंदर व प्लास्टिकमुक्त कळवण घडविण्यासाठी नगरपंचायतीला सहकार्य करण्याचे आवाहन केले. प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अशा प्रकारच्या तपासणी व जनजागृती मोहिमा नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कारवाईत प्रशासकीय अधिकारी निवृत्ती कुंवर, स्वच्छता निरीक्षक प्रवीण नेय्या, शहर समन्वयक गिरीश मोरे, मुकादम ठाकूर सोनगात, लिपिक धनराज परदेशी तसेच शिपाई दत्तात्रय जाधव, शिवदास गोयर, संजय बस्ते, नाना बस्ते, अशोक अहिरे आदी कर्मचारी सहभागी झाले. नगरपंचायतीच्या या मोहिमेमुळे शहरात प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती होऊन पर्यावरण संरक्षणाला चालना मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.